करोनाची कोणतीही लक्षणं दिसली तर ताबडतोब तपासणी करून घ्या. दुखणं अंगावर काढू नका असं आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे. उशीर झाल्याने रुग्ण दगावल्याचा अनुभव मला सर्व जिल्ह्यांमध्ये येत आहेत असं कळकळीचं आवाहन राजेश टोपे यांनी केलं आहे. "आपण सर्वजण करोनाच्या महामारीशी लढत असल्याने काही महत्वाच्या सूचना मी देऊ इच्छितो. आपल्याला थोडी लक्षणं आढळली तरी चाचणी करुन घ्यावी. रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर लगेचच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, उपचार करा. कोणत्याची परिस्थितीत अंगावर दुखणं अंगावर काढू नये. जिल्ह्या जिल्ह्यांमध्ये माझा जो अभ्यास दिसतो तो एकच दाखवतो की उशीर झाल्याने रुग्ण दगावला, त्यामुळे कृपया दुखणं अंगावर काढू नका," असं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. घाबरू नका पण. जागरूक रहा. pic.twitter.com/mobPYKS2hB — Rajesh Tope (@rajeshtope11) April 20, 2021 "कोणत्याही परिस्थितीत लसीकरणास महत्व द्या. करोना महामारीत सुरक्षित ठेवण्यात लस महत्वाची कामगिरी बजावणार आहे. त्यामुळे जरी तुम्हाला बीपी, डायबेटीज, किडनी, ह्रद्य काहीही आजार असला तरी लस लाभदायी आहे. त्यामुले ४५ वर्षांवरील सर्वांनी लसीकरण करुन राष्ट्रीय कार्यक्रमाला सहकार्य करावं," असं आवाहन राजेश टोपे यांनी केलं. "राज्यातील करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने मिशन ब्रेक द चेन हा कार्यक्रम सुरू केला असून अनेक ठिकाणी निर्बंध घातले आहेत. त्यांचं पालन झालंच पाहिजे. जबाबदार नागरिक म्हणून राज्य सरकारला सहकार्य केलं पाहिजे," असंही ते म्हणाले आहेत.