देशात करोनाची दुसरी लाट ओसरत आहे. मात्र असं असताना तिसऱ्या लाटेचा इशारा इंडियन मेडिकल असोसिएशननं दिला आहे. देशाच्या तुलनेत महाराष्ट्रात रुग्णवाढीचा दर कमी आहे. असं असलं तरी करोनाचा धोका पाहता राज्यात करोना रोखण्यासाठीच्या नियमांमध्ये कोणतीही सूट दिली जाणार नाही, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. यामुळे व्यापारी आणि प्रवाशांच्या पदरी निराशा पडली आहे. दुकानं आणि प्रवासाच्या नियमात कोणतेही बदल नसतील, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. राज्यात जास्तीत जास्त लोकांचं लसीकरण करण्यावर आमचा भर असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. राज्यातील १० जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. उर्वरित २६ जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या कमी असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि नगरमध्ये रुग्णसंख्या वाढत आहे.

केंद्र सरकारकडून जास्तीत जास्त लसी या केंद्र सरकारकडून मिळवण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. यासाठी मुख्यमंत्री प्रयत्नशील असल्याचं राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. ऑगस्ट महिन्यात ४ कोटी लसी उपलब्ध होतील असंही त्यांनी यावेळी सांगितलं. सध्या राज्यात होणारा लसींचा पुरवठा हा कमी असल्याचं त्यांनी सांगितलं. दुसरीकडे लसीचे दोन डोस घेतलेल्यांना आरटीपीसीआर विना राज्यात प्रवेश देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.

“आता चंद्रकांत पाटील आणि भाजपाने जनतेची माफी मागावी”

करोनाची पार्श्वभूमी लक्षात घेता आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. सेवानिवृत्तीचं वय ६२ पर्यंत वाढवण्यात आलं आहे. सेवा निवृत्तीचं वय वाढवण्यास कार्योत्तर मान्यता मंत्रिमंडळानं दिली आहे. त्याचबरोबर डॉक्टरांची रिक्त जागा भरण्यासाठी पावलं उचलली जात आहेत. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. दुसरीकडे राज्यांनी घातलेले निर्बंध शिथिल केल्यानंतर लोकं पर्यटनस्थळे आणि बाजारपेठेत मोठी गर्दी करत आहेत. या पार्श्वभूमीवर करोना नियमांचे पालन होत नसेल तर तर पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू करा, अशा सूचना केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्यांना दिल्या आहेत.

लसीकरणावरुन टीका करणाऱ्यांना आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांचं सडेतोड उत्तर; म्हणाले…

राज्य सरकारने मंगळवारी दिलेल्या आकडेवारीनुसार राज्यात ७ हजार २४३ नवे करोनाबाधित आढळले आहेत. हा आकडा सोमवारी ७ हजार ६०३ इतका होता. त्यामुळे नव्याने आढळणाऱ्या करोनाबाधितांची संख्या कमी होऊ लागल्याचं दिसून येत आहे. नव्या करोनाबाधितांच्या आकडेवारीनंतर महाराष्ट्रात आजपर्यंत सापडलेल्या एकूण करोनाबाधितांची संख्या आता ६१ लाख ६५ हजार ४०२ इतकी झाली आहे.