मीच माझा रक्षक, मी घरात थांबणार आणि करोनाला हरवणार हा मंत्र प्रत्येकाने पाळला. स्वयंशिस्त राखली तर कदाचित १४ एप्रिलनंतर काही भागांमध्ये लॉकडाउन शिथील होऊ शकतं असे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून राजेश टोपे यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा स्वयंशिस्त पाळा. मी घरात थांबणार मी करोनाला हरवणार हा मंत्र दिला आहे.

महाराष्ट्रात एकूण ५३७ पॉझिटिव्ह करोनाग्रस्त आहेत. मात्र ५० जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मात्र लॉकडाउन आणि संचारबंदीच्या माध्यमातून आपण काळजी घेत आहोत. ट्रेसिंग करणं हे आता आव्हान आहे. सध्याच्या घडीला ९ लाख लोकांचं ट्रेसिंग केलं आहे. २ हजार ४५५ टीम्स तयार केल्या आहेत. प्रतिबंधित क्षेत्रात त्या टीम करत आहेत. २९० विभाग मुंबई प्रतिबंधित करण्यात आले आहेत. या विभागातही लोक काम करत आहेत. नागपूर, पुण्यातही काम करत आहेत. त्यांना सहकार्य करा असं राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.

दररोज गरम पाणी घ्या, आवळा, लिंबू याचा जेवणात वापर करावा. योग्य पद्धतीने झोप घ्या. योग्य पद्धतीने व्यायाम करा. योगासनं किंवा इतर झेपतील असे व्यायाम करावेत असंही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. आरोग्य विभाग योग्य पद्धतीने काम करतो आहे.

महाराष्ट्रात नवे २ हजार व्हेटिलेटर्स उपलब्ध होत आहेत. २५ लाख ट्रिपल लेअर मास्कही उपलब्ध आहेत. वैद्यकीय साधनं योग्य प्रमाणात आहेत असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. प्रत्येकाने N95 चा आग्रह धरणं योग्य नाही असंही टोपे यांनी स्पष्ट केलं. आरोग्य विभागातील सगळ्या डॉक्टर, कर्मचारी, विविध विभागातले काम करणारे कर्मचारी जसे की पोलीस किंवा इतर सहकारी यांचे मी आभार मानतो. महाराष्ट्राच्या जनतेचेही मी आभार मानतो असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे.