महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्नीसमवेत रविवारी एका खास लग्न सोहळ्यास हजेरी लावली होती. नागपूरच्या सद्भावना लॉनमध्ये पार पडलेल्या या विवाहसोहळ्यात अनिल देशमुख यांनी वधुपक्षातर्फे हजेरी लावत कन्यादान केले. दिव्यांग, गतिमंद आणि बेवारस मुला-मुलींचे पालकत्व घेणाऱ्या सांभाळ करणाऱ्या शंकरबाबा पापळकरांकडील समीर आणि वर्षा या दाम्पत्याच्या विवाहसोहळ्याची चर्चा सध्या संपूर्ण नागपूर शहरात होत आहे. समीर हा डोबिंवली येथे बेवारस अवस्थेत सापडला होता. त्यानंतर शंकरबाबा पापळकरांनी त्याला दत्तक घेत त्याच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली होती. तर वर्षा ही २३ वर्षांपूर्वी नागपूर रेल्वे स्थानकात बेवारस अवस्थेत आढळली होता. तिला अमरावती येथील अंबादास पंत अनाथाश्रमात ठेवण्यात आले होते. त्यानंतर शंकरबाबा पापळकरांनी वर्षाला दत्तक घेतले व तिच्याही शिक्षणाची संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली. वर्षा आणि समीर दोघेही मूकबधिर आणि अनाथ. एकाच आश्रमात लहानाचे मोठे झालेल्या समीरने वर्षासोबत विवाह करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर रविवारी त्यांचा विवाहसोहळा पार पडला. गृहमंत्री अनिल देशमुखांनी वर्षाचे तर नागपूरचे जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी समीरचे पिता म्हणून जबाबदारी स्वीकारली होती. त्यानंतर अनिल देशमुखांनी वर्षाचे कन्यादान केले. त्याआधी अनिल देशमुख यांच्या घरी दोघांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. तेथेच लग्नाआधी सर्व कार्यक्रम पार पाडले गेले. या खास अशा विवाह सोहळ्याला खासदार कृपाल तुमाने, पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत तसेच राजकीय क्षेत्रातील व अन्य अधिकारी उपस्थित होते.