महाराष्ट्रातली हॉटेल्स सुरु होण्याचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेच होते. अशात आता ८ जुलैपासून महाराष्ट्रातली हॉटेल्स आणि रेस्तराँ सुरु होऊ शकतात. लवकरात लवकर महाराष्ट्रातली हॉटेल्स सुरु करण्यात येतील असं स्पष्ट करण्यात आलं होतं. ही तारीख ८ जुलै असू शकते. ८ जुलैपासून रेस्तराँ आणि हॉटेल्स सुरु झाली तर त्यांना नियमांचं पालन मात्र करावंच लागणार आहे. महाराष्ट्रात १ लाख ५० हजारांच्या घरात हॉटेल्स आहेत तर ६५ हजार रेस्तराँ आहेत. ज्यामध्ये लाखो कर्मचारी काम करतात. त्यांना ही दिलासा देणारी बातमी आहे. टाइम्स नाऊने या संदर्भातले वृत्त दिले आहे. हॉटेल्स आणि रेस्तराँ सुरु झाल्याने अर्थव्यवस्थेलाही हातभार लागू शकतो.

हे आहेत नियम

हॉटेलची जी क्षमता आहे त्याच्या ३३ टक्के पाहुण्यांना संमती दिली जाऊ शकते.

रेस्तराँमध्येही फक्त राहण्यासाठी संमती देण्यात आलेली आहे

रेस्तराँमधून अन्न देता येईल का? याबाबत अद्याप निर्णय होणं बाकी आहे

ज्यावेळी ग्राहक येतील तेव्हा थर्मोमीटरने तापमान पाहणं गरजेचं आहे

रिसेप्शन टेबलवर स्क्रिनिंग करणं सक्तीचं असणार आहे

सॅनेटायझरचा वापर हा सक्तीसाठी करण्यात आला आहे

हॉटेल्स आणि रेस्तराँमध्ये असलेले गेमिंग झोन, स्विमिंग पूल, जिम हे बंदच राहणार आहेत

जे ग्राहक हॉटेल्समध्ये राहण्यासाठी येतील त्यांना मास्क वापरणं अनिवार्य असणार आहे.

मिशन बिगीन अगेनच्या अंतर्गत हॉटेल्स १०० टक्के सुरु करता येणार नाही. पण टप्प्याटप्प्याने सगळी काळजी घेऊन नियोजन केलं जाईल असं मुख्य सचिव संजीव कुमार यांनी काल झालेल्या बैठकीत स्पष्ट केलं. तर मिशन बिगीन अंतर्गत राज्यात अनेक उद्योग आणि व्यवसाय सुरु करण्यात आले आहेत. अशात हॉटेल्स आणि रेस्तराँ सुरु करण्याबाबत लवकरच निर्णय होईल असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारीच सांगितलं होतं. अशात आता ८ जुलैपासून मर्यादित स्वरुपात हॉटेल्स आणि रेस्तराँ सुरु होण्याची शक्यता आहे.