महाराष्ट्र केसरीचा मान मिळवलेला बुलडाण्याचा पैलवान बाला रफिक शेखने मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली आहे. बाला रफिक शेखने राज ठाकरे यांच्या निवासस्थानी कृष्णकुंजवर जाऊन त्यांनी भेट घेतली. यावेळी बाला रफिकने राज ठाकरेंनी आपल्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्याचं सांगितलं. भेट झाल्यानंतर बाला रफिक शेखने पत्रकारांशी संवाद साधला. बाला रफिक शेखने सांगितलं की, 'राज ठाकरे यांनी मला शुभेच्छा दिल्या आणि माझा सत्कार केला. खुराकासाठी मला बक्षिसही दिलं आहे. त्याच्यामुळे मी त्यांचा खूप आभारी आहे. पुढील वाटचालीसाठी त्यांनी मला शुभेच्छा दिल्या आहेत'. शासकीय सेवेत घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आपल्याला आश्वस्त केलं असल्याची माहितीही यावेळी त्याने दिली. बाला रफिक शेखने यावर्षीचा महाराष्ट्र केसरी किताब पटकावला आहे. गुणांच्या जोरावर बुलडाण्याच्या बाला रफिक शेखने गतविजेता अभिजित कटकेला पराभूत केले. सलग दुसऱ्यांदा विजेतेपद मिळवण्यात अभिजितला अपयश आले. ११-३ अशा गुणाने बाला रफिक शेखने अभिजितला धूळ चारली. 'महाराष्ट्र केसरी २०१८' विजेते पै. बाला रफीक आदम शेख ह्यांनी आज कृष्णकुंज येथे मनसे अध्यक्ष श्री. राजसाहेब ठाकरे ह्यांची सदिच्छा भेट घेतली. pic.twitter.com/Za3BHwutEK — MNS Adhikrut (@mnsadhikrut) December 28, 2018 लढतीच्या सुरुवातीलाच अभिजितने एक गुणांची कमाई केली होती. आक्रमक सुरुवातीमुळे सामना अटीतटीचा होईल असे वाटले होते. परंतु, नंतर बाला रफिकने ताकदीच्या आणि अनुभवाच्या जोरावर गुणांची वसुली केली. बालारफीने आक्रमक धोरण स्वीकारल्यानंतर अभिजितला पुनरागनाची संधीच लाभली नाही. बुलडाण्याचा बाला रफिक पुण्यातील हनुमान आखाड्याचा मल्ल आहे. बाला रफिकने उपांत्य फेरीत रत्नागिरीच्या संतोष दोरवडला पराभूत केले. तर अभिजितने सोलापूरच्या रवींद्रला चीतपट केले होते. बाला रफिक शेखने तिसऱ्या प्रयत्नात महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवले होते. बाला रफिकने मानाची गदा पटकावल्यानंतर त्याचे ६५ वर्षीय वडील आझम शेख यांना आनंदाश्रू आवरणे कठीण झाले होते. त्यांना हा आनंद शब्दात सांगता येत नव्हता. अत्यंत भावुक होऊन त्यांनी मुलाच्या विजयी उत्सव साजरा केला. पुण्यातील नव्या दमाच्या २१ वर्षीय अभिजितसमोर बलाढ्य आणि अनुभवी बाला रफिक शेखचे आव्हान होते. त्यामुळे त्याची विजयासाठी कसरत होण्याची शक्यता होती. परंतु, ही लढत एकतर्फीच झाल्याचे दिसून आले. गुणांवर बाला रफिकने अभिजितला पराभूत केले. माती विभागात आतापर्यंत बाला रफिकने तीन वेळा फायनलपर्यंतचा पल्ला गाठला होता. त्यामुळे तो कसलेला मल्ला मानला जातो.