करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे राज्यात बिकट परिस्थिती निर्माण झाली होती. गेल्या काही दिवसांपासून रुग्णवाढीचा वेग मंदावत असून, रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे. पण, अजूनही दैनंदिन रुग्णसंख्येत दिलासादायक अशी घट झाल्याचं दिसत नाहीये. त्यामुळे राज्य सरकारने लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी रात्री राज्यातील जनतेशी संवाद साधताना लॉकडाउन १५ दिवसांसाठी वाढत असल्याची घोषणा केली. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेनंतर भाजपाने काही मुद्द्यांवर बोट ठेवत मुख्यमंत्र्यांना सहा सवाल केले आहेत.

राज्यात लागू करण्यात आलेल्या लॉकडाउन १ जून रोजी सकाळी मुदत संपत असल्याने राज्य सरकार पुढे काय निर्णय, याकडे लोकांचं लक्ष लागलं होतं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी फेसबुक लाईव्हद्वारे जनसंवाद साधत, परिस्थिती नियंत्रणात येत असली, तरी पहिल्या लाटेच्या समान आहे. त्यामुळे लॉकडाउन १५ दिवसांसाठी वाढवत असल्याची घोषणा केली. मुख्यमंत्र्यांनी या जनसंवादात विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. मुख्यमंत्र्यांच्या फेसबुक लाईव्हवरून भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विट करत टोला लगावला. केशव उपाध्ये यांनी कोकणातील चक्रीवादळग्रस्तांच्या मदतीपासून ते दहावी-बारावीच्या परीक्षा आणि लसीकरणापर्यंत विविध मुद्दे उपस्थित करत काही सवाल केले आहेत.

तिसऱ्या लाटेचे निमंत्रक होऊ नका!; मुख्यमंत्र्यांचा व्यापारी आणि विरोधकांना इशारा

“नेहमी प्रमाणे फेसबुक लाईव्ह म्हणजे कोरड्या गप्पा. ना दिलासा ना विचार किमान उत्तर हवी होती. गेल्या वर्षी निसर्ग वादळाची मदत मिळाली नाही तर यंदाच्या वादळाची मदत कधी मिळणार?, महिनाभरापूर्वी जाहीर केलेल पॅकेज अजून अनेकांना मिळाले नाही ते कधी मिळणार? राज्याने महिना भरात लस विकत का घेतली नाही?, शिक्षणात क्रांतीकारण निर्णय घेणे गरजेचे म्हणजे परीक्षा न घेणे का?, अर्थचक्र कधी फिरणार?, ‘माझं गाव करोनामुक्त’ हे जनतेने करायचं तर मग आपण काय करणार?,” असे सवाल केशव उपाध्ये यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केले आहेत.

Maharashtra Lockdown : निर्बंध अंशत: शिथिल; दुकाने २ वाजेपर्यंत खुली

नवा लॉकडाउन शहरं व जिल्ह्यांनुसार…

राज्यात लॉकडाउन लागू करताना रुग्णसंख्येनुसार दोन विभाग करण्यात आले आहेत. ‘अ’ श्रेणीत करोना चाचणीत १० टक्के किंवा त्यापेक्षा कमी करोनाबाधितांचे प्रमाण आणि प्राणवायूयुक्त खाटा ४० टक्यांपेक्षा कमी भरलेल्या असल्यास निर्बंध शिथिल केले जातील. अशी शहरे आणि जिल्ह्यांमध्ये दुकानं सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत खुली राहतील. अन्य दुकानं उघडण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाकडून घेतला जाईल. चाचणीत करोनाबाधितांचे प्रमाण २० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त असलेल्या जिल्ह्यांमध्ये कडक निर्बंध लागू असतील. अशा जिल्ह्यांच्या सीमा बंद केल्या जातील. जेणेकरून या जिल्ह्यांतून लोक बाहेर जाणार नाहीत वा अन्य जिल्ह्यांतील नागरिक जास्त रुग्णसंख्या असलेल्या जिल्ह्यांमध्ये येणार नाहीत. शेतीचा हंगाम असल्याने दुपारी २ पर्यंत खते, बि-बियाणे, अवजारे आदींची दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. स्थानिक प्रशासनाला वेळेबाबत निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.