लातूर जिल्हा परिषदेवर भाजपची निर्विवाद सत्ता; सरकारच्या योजनांचा प्रचार तसेच कार्यकर्त्यांशी संवादाने यश लातूर हा पारंपरिक काँग्रेसचा बालेकिल्ला. विलासराव देशमुख आणि शिवाजीराव निलंगेकर-पाटील या जिल्ह्य़ातील दोन नेत्यांनी मुख्यमंत्रीपद भूषविले. जिल्ह्य़ातील सारी सत्ताकेंद्रे वर्षांनुवर्षे काँग्रेसच्या ताब्यात होती. पण विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर काँग्रेसला उतरती कळा लागली. लोकसभेपासून सुरू झालेली ही घसरण पार जिल्हा परिषदेपर्यंत कायम राहिली आणि भाजपला यश मिळत गेले. भाजपच्या या विजयाचे सारे श्रेय पालकमंत्री संभाजी निलंगेकर-पाटील यांना जाते. वर्षभरात जिल्ह्य़ावर एकहाती पकड त्यांनी निर्माण केली. निजामाच्या जोखडातून मराठवाडा मुक्त झाला तरी जिल्हय़ावर कोणत्या ना कोणत्या कुटुंबाची सत्ता राहिली. लोकशाही पद्धतीने निवडणुका होत असल्या तरी त्या निवडणुका राजेशाही थाटात व्हायच्या अन् संपूर्ण सत्तेचे केंद्र काही मर्यादित कुटुंबाच्या घरातच राहायचे. एखाद्या लोकप्रतिनिधीला त्याच्या मनातील खदखद किंवा आपल्या भागातील जनतेला नेमके काय वाटते हेदेखील मनमोकळेपणे बोलण्याची मुभा नव्हती. आपल्या नेत्याला जे वाटेल, जे रुचेल, जे पटेल तेच बोलावे लागत असे. त्यातून काही कुटुंबांची भरभराट झाली. देश व राज्यपातळीवर नावलौकिक झाला, मात्र जनतेच्या परिस्थितीत फारसा फरक पडला नाही. विलासराव देशमुख, शिवराज पाटील चाकूरकर, डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे व्यक्तिगत वलय बरेच काळ टिकले. आता काळ बदलला आहे. राज्यात सत्तांतर झाले. संभाजी पाटील निलंगेकर यांनी एक वेळ विजय व एक वेळ पराभव अनुभवला होता व नव्याने ते पुन्हा निवडून आल्यानंतर मंत्रिमंडळात स्थान मिळण्यासाठी त्यांना वाट पाहावी लागली. मंत्रिपद मिळाल्यानंतरही पालकमंत्रीपदाची जबाबदारी मिळण्यातही उशीर झाला, मात्र तोपर्यंत त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली होती. पालकमंत्रीपद मिळाल्यानंतर आपण जिल्हय़ाचे पालकमंत्री आहोत हे लक्षात घेऊन जिल्हय़ातील पक्षातील प्रमुख नेत्यांसोबत एकत्र बसून नेमक्या काय अडचणी आहेत? पक्षहितासाठी दोन पावले मागे जाण्याची तयारी प्रत्येकाने ठेवली पाहिजे असे सांगत त्याची सुरुवात स्वतपासून केली. मंत्री असले तरी आठवडय़ातील दोन दिवस मतदारसंघासाठी द्यायचे हे ठरवून त्यांनी सतत प्रवास सुरू ठेवला. नगरपरिषदा निवडणुकीच्या वेळी अशक्य कोटीतील गोष्टी शक्य करून दाखवल्या. नगरपालिकेपासून यशाची सुरुवात निलंगा नगरपरिषदेच्या यशाबरोबरच पहिल्यांदाच उदगीर नगरपालिकेत बहुमत आणले व अहमदपूरचे आ. विनायक पाटील यांना भाजपात प्रवेश करायला लावला व अहमदपूरमध्ये भाजपचा झेंडा फडकविला. जिल्हा परिषदेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर काँग्रेसचा गड मानलेल्या मांजरा पट्टय़ातील ज्या ठिकाणी जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे दावेदार असणारे विलासराव देशमुखांचे सुपुत्र धीरज देशमुख निवडणूक लढवणार होते त्या मतदारसंघातून भाजपाने प्रचाराचा शुभारंभ केला. ही सुरुवातच अशी दणदणीत होती की त्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना धडकी भरली. प्रचारसभेतील धडाकेबाज भाषणांबरोबरच कार्यकर्त्यांना मी आपल्या सोबत आहे, घाबरू नका असा विश्वास दिला. आपण जिंकू शकतो ही जिद्द निर्माण केली. हे करताना ग्रामीण भागापर्यंत केंद्र व राज्य सरकारने राबविलेल्या योजना नीट पोहोचत आहेत की नाही, याची माहिती घेऊन त्या योजना कशा जनहिताच्या आहेत हे लोकांच्या मनावर िबबवण्याचा प्रयत्न केला. केंद्र सरकारने घेतलेला नोटाबंदी निर्णयाचे समर्थन केले. जलयुक्त शिवार योजना कशी लाभदायी आहे हे पटवले. आगामी काळात हमरस्ते, रेल्वेचे जाळे, बेरोजगारांना रोजगार यावर त्यांनी भर दिला. जिल्हा परिषदेचा अध्यक्ष वातानुकूलित गाडीत फिरणारा हवा की ज्याच्या मनगटात नांगर धरण्याचे बळ आहे तो शेतकरी हवा, असा प्रश्न जिल्हाभर अनेक सभांमध्ये विचारला गेला. सामान्य लोकांना शासनाकडून नेमकी काय अपेक्षा, तसेच त्यांचे मूलभूत प्रश्न काय आहेत, हे जाणून घेऊन सरकार तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध आहे हा विश्वास नागरिकांमध्ये निर्माण करणे आवश्यक असते. जिल्ह्य़ातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचून त्यांच्या मनात विश्वासाची भावना निर्माण केली. जिल्ह्य़ात जुन्या सत्ताधाऱ्यांच्या विरुद्ध रोष होता. विकासाची कामे मार्गी लावली. नगरपालिका निवडणुकांनंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मिळालेला कौल हा आपला सर्वोच्च सन्मान समजतो. -संभाजी पाटील निलंगेकर, पालकमंत्री लातूर