संदीप आचार्य

करोनाविरोधातील लढाई शिस्तबद्ध पद्धतीने करण्याची गरज असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून ते सर्वच नेते व तज्ज्ञ डॉक्टर्स सांगत आहेत. या लढाईत जास्तीतजास्त चाचण्या होणे गरजेचे असताना बहुतेक राज्यं अजूनही फारशी गंभीर नसल्याचेच दिसून येत आहे. मात्र करोनाची चाचणी करण्यात महाराष्ट्र देशात अव्वल ठरला आहे. १८ एप्रिल पर्यंत महाराष्ट्राने देशात सर्वाधिक ५९,१५७ चाचण्या केल्या आहेत. महाराष्ट्रापाठोपाठ राजस्थानचा क्रमांक असून त्यांनी ४२,७१८ चाचण्या केल्या आहेत तर तिसऱ्या क्रमांकावरील गुजरातने ३०,७३८ चाचण्या केल्या आहेत.

देशातील लॉकडाउनची मुदत ३ मे पर्यंत वाढवताना देशासमोर केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २० एप्रिपर्यंत वेगवेगळी राज्यं करोनाच्या लढाईत कसं काम करतात याचा सखोल आढावा घेतला जाईल असे सांगितले होते. पंतप्रधानांच्या भाषणानंतरही देशातील अनेक राज्ये गंभीर नसल्याचे चित्र ‘आयसीएमआर’ च्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. १८ एप्रिल सकाळी ८ वाजेपर्यंत ची आकडेवारी आयसीएमआरने जाहीर केली आहे. मागील चार आठवड्यात देशातील कोणत्या राज्यांनी किती चाचण्या केल्या हे यात नमूद केले आहे. महाराष्ट्राने सर्वाधिक चाचण्या केल्यामुळे देशातील अन्य राज्यांच्या तुलनेत करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्याही जास्त दिसत आहे. देशातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये २६,९२० चाचण्या करण्यात आल्या तर देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत फक्त २०,१४९ चाचण्या करण्यात आल्या आहेत.

केवळ सात राज्यांमध्ये २० हजाराहून अधिक करोनाच्या चाचण्या करण्यात आल्या असून आंध्र प्रदेश, हरयाणा, मध्य प्रदेश, बिहार, कर्नाटक व तेलंगणात तुलनेत कमी चाचण्या करण्यात आल्या आहेत. जम्मू- काश्मीरमध्ये केवळ ६९८६ लोकांच्याच करोना चाचणी करण्यात आली असून लक्षद्वीप येथे केवळ ७ जणांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. देशात आज १४,३७८ रुग्ण करोनाबाधित असून एकट्या महाराष्ट्रात ३६४८ रुग्ण करोनाबाधित आहेत.

जगातील २०० हून अधिक देशात करोनाची लागण झाली असून अमेरिकेला त्याचा सर्वात मोठा फटका बसला आहे. अमेरिकतील जॉन हाफकीन्स संस्थेने प्रसिद्ध केलेल्या अहवालात एप्रिलच्या मध्यावर भारतात अडीच कोटी करोनाचे रुग्ण आढळतील व सुमारे २५ लाख लोकांचे मृत्यू होतील असे म्हटले होते. तथापि भारताने वेळीच लॉकडाउन करून आवश्यक ती काळजी घेतल्याने आपल्याकडे लोकसंख्या घनता जास्त असूनही करोनाची लागण जॉन हाफकीन्सच्या अहवालात नमूद केल्याप्रमाणे झालेली नाही. तथापि जगभरातील विविध देशांनी केलेल्या चाचण्यांच्या तुलनेत भारतात खूपच कमी चाचण्या झाल्या असून महाराष्ट्राने याबाबत सजगता ठेवल्याचे राज्याचे मुख्य आरोग्य सल्लागार डॉ सुभाष साळुंखे यांनी सांगितले. देशातील सर्वच राज्यांनी आपल्याकडील चाचणीचे प्रमाण वाढवणे आवश्यक असून महाराष्ट्रानेही रॅपिड टेस्टच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात चाचणी करणे गरजेचे असल्याचे डॉ साळुंखे म्हणाले.

खासकरून ज्या विभागात करोनाचे रुग्ण आढळतात तेथील संपूर्ण विभागात या चाचण्या झाल्या पाहिजेत. खासकरून वरळी व धारावी सारख्या विभागात रॅपिड टेस्ट झालीच पाहिजे असे पालिकेच्या काही ज्येष्ठ डॉक्टरांचे म्हणणे आहे. करोनाच्या चाचणीमध्ये महाराष्ट्र देशात सर्वप्रथम आहे ही निश्चितच चांगली गोष्ट आहे परंतु अजुनही धोका मोठा असल्याने जास्त काळजी घ्यावी लागणार आहे, असे डॉ सुभाष साळुंखे यांनी सांगितले.