देशभरासह राज्यातील करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकार व प्रशासन युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहे. मात्र तरी देखील करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. तसेच, करोनामुळे मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येतही दररोज भर पडत आहे. यामध्ये सामान्य नागरिकांबरोबरच करोना योद्धयांचा देखील समावेश असल्याचे दिसून येत आहे. राज्यात मागील २४ तासांमध्ये आणखी ३०३ पोलीस करोनाबाधित आढळले असून, पाच पोलिसांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.

राज्यातील करोनाबाधित पोलिसांची संख्या आता १३ हजार १८० वर पोहचली आहे. यामध्ये सध्या उपचार सुरू असलेले २ हजार ३८९ जण, करोनामुक्त झालेले १० हजार ६५५ जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या १३६ जणांचा समावेश आहे. एएनआयने हे वृत्त दिले आहे.

राज्यातील १३ हजार १८० करोनाबाधित पोलिसांमध्ये १ हजार ३८७ अधिकारी व ११ हजार ७९३ कर्मचारी यांचा समावेश आहे. सध्या उपचार सुरू असलेल्या (अॅक्टिव्ह)२ हजार ३८९ पोलिसांमध्ये ३१३ अधिकारी व २ हजार ७६ कर्मचारी आहेत.

करोनामुक्त झालेल्या १० हजार ६५५ पोलिसांमध्ये अधिकारी १ हजार ६० व ९ हजार ५९५ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर, आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्या १३६ पोलिसांमध्ये १४ अधिकारी व १२२ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

करोना संसर्ग रोखण्यासाठी व नागरिकांनी शासकीय नियमांचे पालन करून सुरक्षित राहावे, यासाठी या महामारीच्या काळात जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना देखील दिवसेंदिवस करोनाचा संसर्ग होत असल्याचे दिसून येत आहे.

गेल्या दोन दिवसांत मुंबईत चार पोलिसांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबई पोलीस दलातील साडेतीन हजार अधिकारी, अंमलदार करोनाबाधीत झाले. त्यापैकी सुमारे तीन हजार करोनामुक्त झाले, मात्र ६१ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे.