शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ‘ईडी’कडून नोटीस पाठवण्यात आल्याने थंडीच्या लाटेतही राज्यात राजकारण गरम झालं आहे. राऊत यांच्या पत्नीला पाठवण्यात आलेल्या नोटीसीवरून राष्ट्रवादी काँग्रेसने मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. “भाजपाच्या विरोधात असणाऱ्यांना सुडबुद्धीने नोटीस पाठवली जात आहे. भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे,”असा आरोप राष्ट्रवादीनं केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी टीव्ही ९ वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत भाजपावर टीकास्त्र डागलं आहे. वर्षा राऊत यांना पाठवण्यात आलेल्या ईडीच्या नोटिसीविषयी बोलताना मलिक म्हणाले,”महाराष्ट्रासाठी ईडीचा हा खेळ नवा नाही. भाजपाच्या विरोधात असणाऱ्यांना सूडबुद्धीने नोटीस पाठवली जात आहे. यातून केंद्र सरकार विरोधकांची बदनामी करून त्यांच्या मनात भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे,” असं मलिक म्हणाले.

आणखी वाचा- ईडीच्या नोटीसवर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

“तुमच्या ‘ईडी’च्या कारवाईला कोण घाबरतंय?,” असा सवाल करत मलिक म्हणाले,”यापूर्वी ईडीने शरद पवार यांना नोटीस पाठवली होती. मग ती नोटीस मागे का घेतली?,” असा प्रश्न नवाब मलिक यांनी उपस्थित केला आहे. “सरकारी यंत्रणांचा वापर करून भाजपाला सत्ता मिळेत, असे वाटत असेल तर तो त्यांचा गैरसमज आहे, असंही मलिक यांनी म्हटले आहे.

आणखी वाचा- वर्षा राऊत यांना पाठवलेल्या ईडी नोटीशीवर आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

“भाजपाकडून प्रत्येक राज्यात दबावतंत्र वापरले जात आहे. केंद्र सरकारकडून राज्यांना पैसे दिले जात नाहीत. राज्यातील प्रकल्पांमध्ये अडथळे निर्माण केले जातात. अरूणाचल प्रदेशात ‘जदयू’सोबत काय झाले ते पहा. बिहारच्या निवडणुकांसाठी अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येचं भांडवल करण्यात आलं. भाजपाने त्यासाठी सीबीआयचा कशाप्रकारे वापर केला, हे देशाला माहिती आहे,” असं म्हणत मलिक यांनी मोदी सरकार व भाजपावर निशाणा साधला आहे.