राज्यातील करोना संसर्गाचे प्रमाण कमी होत असून, रूग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढताना दिसत आहे. दररोज आढळणाऱ्या करोनाबाधितांच्या तुलनेत करोनातून बरे होणाऱ्यांची संख्या सातत्याने अधिक आढळून येत आहे. मात्र, करोनामुळे अद्यापही रूग्णांचे मृत्यू सुरूच आहेत. राज्य सरकारकडून निर्बंध शिथिल करण्यात आलेले आहेत. दरम्यान, राज्यात आज दिवसभरात ११ हजार ३२ रूग्ण करोनातून बरे झाले असून, १० हजार ६६ नवीन करोनाबाधित आढळून आले आहेत. तर, १६३ करोनाबाधित रूग्णांचा आज राज्यात मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.

राज्यात आजपर्यंत एकूण ५७,५३,२९० करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ९५.९३ टक्के एवढे झाले आहे. तर, सध्या राज्यातील मृत्यूदर १.९९ टक्के एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,०१,२८,३५५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५९,९७,५८७ (१४.९५टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
सध्या राज्यात ५,९२,१०८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४,२२३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण १,२१,८५९ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

महाराष्ट्रात Delta Plus Variant चं प्रमाण फक्त ०.००५ टक्के, पण त्याचे गुणधर्म गंभीर – आरोग्यमंत्री राजेश टोपे

केंद्र सरकारने नुकताच करोनाच्या Delta Plus Variant चा समावेश Variant of Concern या श्रेणीमध्ये केला आहे. या पार्श्वभूमीवर देशभरात सापडणारे डेल्टा प्लसचे रुग्ण हा केंद्रीय आरोग्यम विभागासाठी काळजीचा विषय ठरला आहे. देशभरात आत्तापर्यंत जवळपास ४० करोना रुग्णांमध्ये डेल्टा प्लस हा करोनाचा प्रकार आढळला असून त्यामध्ये महाराष्ट्रातल्या २१ रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे केंद्रानं महाराष्ट्रासह केरळ आणि मध्य प्रदेश या तीन राज्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.