महाराष्ट्रात गेल्या २४ तासात ५ हजार ३१८ नवे करोना रुग्ण आढळले आहेत. तर १६७ मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात जे १६७ मृत्यू गेल्या चोवीस तासात नोंदवले गेले त्यातले ८६ मृत्यू मागील ४८ तासांमधले आहेत. तर ८१ मृत्यू मागील कालावधीतले आहेत. राज्यातील मृत्यूदर ४.५७ टक्के इतका आहे. मागील २४ तासात ४४३० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आजपर्यंत ८४ हजार २४५ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण म्हणजे रिकव्हरी रेट ५२.९४ टक्के इतके झाले आहे. आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या ८ लाख ९६ हजार ८७४ नमुन्यांपैकी १ लाख ५९ हजार १३३ नमुने पॉझिटिव्ह आलेत.

सध्या राज्यात ६७ हजार ६०० रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. राज्यात ५ लाख ६५ हजार १६१ लोक होम क्वारंटाइन आहेत आणि ३६ हजार ९२५ लोक संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.

मुंबईत १४६० नवे करोना रुग्ण

मुंबईत करोनाचे नवे १४६० रुग्ण मागील २४ तासांमध्ये आढळले आहेत. तर मागील २४ तासांमध्ये मुंबईत ४१ मृत्यूंची नोंद झाली आहेत. या नव्या संख्येसह मुंबईतल्या करोनाग्रस्तांची एकूण संख्या ही ७३ हजार ७४७ झाली आहे. तर आत्तापर्यंत ४ हजार २८२ रुग्णांचा मुंबईत करोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्याच्या घडीला मुंबईत २७ हजार १३४ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत अशी माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे.