राज्यातील करोना संसर्गाचा वेग दिवसेंदिवस पुन्हा एकदा अधिकच झपाट्याने वाढत असल्याचे दिसत आहे. दररोज मोठ्यासंख्येने करोनाबाधित आढळून येत असून, मृत्यूंच्या संख्येतही भर पडत आहे. ही परिस्थिती पाहता आता राज्य सरकार व प्रशासकीय यंत्रणांकडून करोना प्रतिबंधात्मक नियमांची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. अनेक शहारांमध्ये तर लॉकडाउन देखील घोषित करण्यात आला आहे. याशिवाय, लसीकरणाचा वेग आणखी वाढवणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील सांगितलेलं आहे. दरम्यान, आज दिवसभरात राज्यात २३ हजार १७९ नवीन करोनाबाधित वाढले असून, ८४ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. तर, आजपर्यंत राज्यात ५३ हजार ८० रूग्णांचा मृत्यू झालेला आहे.  सध्या राज्यातील मृत्यूदर २.२४ टक्के एवढा आहे.  याशिवाय, राज्यात आज रोजी एकूण १,५२,७६०  ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

आज ९ हजार १३८ रुग्ण करोनातून बरे झाले आहेत. तर, राज्यात आजपर्यंत एकूण २१,६३,३९१  करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ९१.२६ टक्के एवढे झाले आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,७८,३५,४९५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २३,७०,५०७ (१३.२९ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ६,७१,६२० व्यक्ती गृहविलगीकरणात आहेत. तर ६  हजार ७३८ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणामध्ये आहेत.

आता दिवसाकाठी तीन लाखांच्या गतीने लसीकरण करण्याचा निर्धार – राजेश टोपे

दरम्यान, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज  राज्यातील लसीकरण कार्यक्रमाबद्दल जनतेला माहिती दिली. “आज करोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी एकूण १८८० सेंटर महाराष्ट्रात मंजूर करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये आतापर्यंत आपण ३३ लाख ६५ हजार ९५२ एवढ्या लोकांना लसीकरण करण्यात आलेलं आहे. या लसीकरणाचा समाजातील घटकांमध्ये आरोग्य कर्मचारी, आघाडीच्या फळीतील कर्मचारी, ६० पेक्षा अधिक वय असणारे व्यक्ती व ४५ पेक्षा जास्त वय असलेले कोमॉर्बिड लोकांचा समावेश आहे. या सर्वांमध्ये आपण जर आज बघितलं तर २ लाख ३२ हजार ३४० एवढं कालचं लसीकरण झालेलं आहे. आपण आता तीन लाखाच्या गतीने लसीकरण करायचं असा निर्धार आपण केलेला आहे. त्यामुळे जर आपल्याला अशा स्वरूपात लसीकरण करायचं असेल, तर आपल्याल लसीकरणाची गती जी आपण वाढवलेली आहे, त्यासाठी लागणारी लस देखील तेवढ्याच गतीनं प्राप्त होणं गरजेचं आहे.” असं राजेश टोपे म्हणाले.