महाराष्ट्रात मागील २४ तासात करोनाचे अवघे ३ हजार ९५९ नवे रुग्ण आढळले आहेत. तर आज दिवसभरात ६ हजार ४७८ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात आत्तापर्यंत एकूण १६ लाख ६९ हजार ९० रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा ९१.५३ इतका झाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. राज्यात आज १५० करोना रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर २.६३ टक्के इतका आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ९३ लाख ७८ हजार ५३१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७ लाख १४ हजार २७३ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

महाराष्ट्रात सध्या १० लाख ७१ हजार १६३ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत तर ९ हजार ७९९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. राज्यात आज घडीला ९९ हजार १५१ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आज राज्यात ३ हजार ९५९ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील करोनाग्रस्तांची एकूण संख्या १७ लाख १४ हजार २७३ इतकी झाली आहे. आज नोंद झालेल्या १५० मृत्यूंपैकी ७० मृत्यू हे मागील ४८ तासांमधले आहेत. तर ४७ मृत्यू मागील आठवड्यातले आहे. उर्वरित ३३ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा कमी कालावधीतले आहेत असंही आरोग्य विभागाने स्पष्ट केलं आहे.