राज्यातील करोना संसर्गाचे प्रमाण मागील काही दिवसांपासून झपाट्याने वाढत आहेत. दररोज मोठ्या संख्येने करोनाबाधित आढळत असून, रुग्णांच्या मृत्यूच्या संख्येतही भर पडतच आहे. या पार्श्वभूमीवर सरकारकडून कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. अनेक प्रमुख शहरांमध्ये लॉकडाउन व नाईट कर्फ्यूची देखील घोषणा करण्यात आलेली आहे. करोना संसर्गाला आळा घालण्यासाठी प्रशासनाकडून सर्वोतोपरी प्रयत्न सुरू असताना, करोनाचा उद्रेक सुरूच आहे. आज दिवसभरात राज्यात ६ हजार २१८ नवे करोनाबाधित वाढले असून, ५१ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर २.४५ टक्के एवढा आहे. आजपर्यंत राज्यात ५१ हजार ८५७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूणच ही आकडेवारी सर्वसामान्यांसह सरकार व प्रशासनासाठी देखील चिंताजनक आहे.

दरम्यान, आज राज्यात ५ हजार ८६९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आजपर्यंत राज्यात एकूण २० लाख ५ हजार ८५१ जण करोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज मिळालेला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९४.९६ टक्के एवढे झाले आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,५८,६०,९१२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी आजपर्यंत २१ लाख १२ हजार ३१२ (१३.३२टक्के) नमूने पॉझिटिव्ह आढळले आहेत. सध्या राज्यात २ लाख ७९ हजार २८८ जण गृहविलगीकरणात आहेत, तर २ हजार ४८४ जण संस्थात्मक विलगीकरणात आहेत. राज्यातील अॅक्टिव्ह रुग्ण संख्या ५३ हजार ४०९ आहे.

लॉकडाउनसंबंधी आठ दिवसांचा अल्टिमेटम दिल्यानंतर उद्धव ठाकरेंनी बोलावली महत्वाची बैठक

दरम्यान, राज्यात करोना रुग्ण वाढू लागल्याने पुन्हा एकदा लॉकडाउन लागणार का? असा प्रश्न सर्वसामान्यांना सतावू लागला आहे. नागरिकांकडून करोनासंबंधी नियमांचं योग्य पालन होत नसल्याने करोनाची आकडेवारी वाढत असल्याचं सांगितलं जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील रुग्णवाढीची आकडेवारी आणि नागरिक शिस्तपालन करतात की नाही, हे तपासून लॉकडाउन लागू करण्याबाबत आठ-दहा दिवसांनी निर्णय घेतला जाईल असा अल्टिमेटम दिला होता.