राज्यातील करोना संसर्गाचे प्रमाण कमी होताना दिसत आहे. दररोज आढळणाऱ्या करोनाबाधितांच्या तुलनेत अनेक दिवसांपासून करोनामुक्त होत असलेल्यांची संख्या अधिक आढळून येत आहे. राज्यात आज दिवसभरात आढळलेल्या करोनाबाधितांपेक्षा दुप्पट अधिक रूग्ण करोनामुक्त झाले आहेत. तर, राज्याचा रिकव्हरी रेट देखील वाढला आहे. राज्यभरात आज ६ हजार २७० नवीन करोनाबाधित आढळले असून, १३ हजार ७५८ रूग्ण करोनातून बरे झाले आहेत. तर, ९४ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झालेली आहे.

राज्यात आजपर्यंत एकूण ५७,३३,२१५ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९५.८९ टक्के एवढे झाले आहे. तर, आजपर्यंत राज्यात १ लाख १८ हजार ३१३ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झालेला आहे व सध्या राज्यातील मृत्यूदर १.९८ टक्के एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,९६,६९,६९३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५९,७९,०५१ (१५.०७टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ६,७१,६८५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४,४७२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण १,२४,३९८ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.