मुंबई : कमी झालेला हरितपट्टा, वाढलेले काँक्रीटीकरण, औद्योगिकीकरण इत्यादी कारणांमुळे गेल्या काही वर्षांच्या कालावधीत वातावरणाचा समतोल ढासळला असून यामुळे जागतिक तापमानात १.२ अंश सेल्सिअस वाढ झाली आहे. महाराष्ट्राचे तापमानही गेल्या १० वर्षांत सरासरीपेक्षा अधिक राहिले आहे. याबाबत जनजागृती करण्यासाठी जागतिक हवामान संघटनेने २१ जूनपासून ‘शो युअर स्ट्राइप्स’ मोहीम सुरू केली आहे.

‘जागतिक हवामान संघटने’ने १८५० ते २०२० या कालावधीतील जागतिक तापमानाचा आलेख जाहीर केला आहे. यात सुरुवातीची अनेक वर्षे तापमान सरासरीपेक्षा कमी दिसून येत आहे; मात्र गेल्या साधारण १० ते २० वर्षांत तापमान सरासरीपेक्षा अधिक दिसू लागले आहे. या काळात जागतिक तापमानात १.२ अंश सेल्सिअस वाढ झाली आहे.

महाराष्ट्राचा विचार करता प्रामुख्याने १९०१ ते २०२० या कालावधीत तापमान वाढीस सुरुवात झाली आहे. गेल्या १० ते १५ वर्षांत परिस्थिती अधिक बिकट बनली असून या काळात तापमान सरासरीपेक्षा अधिक राहिले आहे.

१९९० नंतर जागतिकीकरणामुळे वातावरणाचे चित्र बदलले. शहरांमध्ये औद्योगिकीकरण वाढले. त्यामुळे शहरांतील हरितपट्टे कमी झालेच; पण गावांकडून शहरांक डे मोठय़ा प्रमाणावर स्थलांतर झाल्याने गावाकडील शेती आणि झाडेही कमी झाली. परिणामी, वातावरणाचा समतोल बिघडून तापमान वाढ होत आहे, असे ‘स्कायमेट’चे महेश पलावट यांनी सांगितले.

प्रत्येकाने आपापल्या प्रदेशाचा आलेख समाजमाध्यमांवर प्रसिद्ध करून तापमानवाढीबाबत जनजागृती करण्याचे आवाहन जागतिक हवामान संघटनेने ‘शो युअर स्ट्राइप्स’ या मोहिमेतून केले आहे.