करोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी एसएससी बोर्डाच्या परीक्षांचा निकाल उशिरानं जाहीर करण्यात आला. दरम्यान राज्याचा निकाल ९५.३० टक्के लागल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली. “करोनाच्या प्रादुर्भावामुळे निकालाला उशिर झाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि इतर सर्वांनी आम्हाला विशेष सहकार्य केलं. सर्वांनी लॉकडाउनच्या काळात अहोरात्र मेहनत केली म्हणून आज निकाल आम्हाला सादर करता येत आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन जाहीर करण्यात आला. त्यामुळे भूगोलाचा पेपर आपल्याला रद्द करावा लागला. तसंच त्यामुळे आपल्याला सरासरी गुण द्यावे लागले,” अशी माहिती शिक्षण विभागाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी दिली. यावर्षीही निकालात मुलींनीच बाजी मारली असून मुलांच्या तुलनेत मुलींचा निकाल ३ टक्क्यांनी अधिक असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल लागल्यानंतर आता दहावीच्या परीक्षेचा निकाल कधी लागणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागले होतं. दरवर्षी दहावीचा निकाल हा साधारण जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केला जातो. मात्र, यंदा करोना संकटामुळे सर्वच निकालांना उशीर झाला आहे. दरम्यान, या mahahsscboard.maharashtra.gov.in, mahresult.nic.inया अधिकृत वेबसाइटवर निकाल पाहता येणार आहे. यावर्षी राज्याचा निकाल ९५.३० टक्के इतका लागला आहे. तर यावर्षी कोकण विभागानं बाजी मारली आहे.

यंदा एकूण १७ लाख ६५ हजार ८९८ विद्यार्थ्यांनी इयत्ता दहवीची परीक्षा दिली होती. यामध्ये विद्यार्थी – ९ लाख ७५ हजार ८९४, विद्यार्थिनी – ७ लाख ८९ हजार ८९४, तृतीयपंथी विद्यार्थी – ११०, अपंग विद्यार्थी – ९ हजार ४५ यांचा समावेश आहे. तर, संवेदनशील केंद्रांची संख्या ८० होती. १५ दहावीची परीक्षा ही ३ मार्च २०२० ते २३ मार्च २०२० दरम्यान घेण्यात आली. मात्र, करोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने सरकारने दहावीचा शेवटचा पेपर रद्द करण्याचा निर्णय घेतला होता.

मुलींचीच बाजी

यंदाही दहावीच्या परीक्षेत निकालात मुलींनीच बाजी मारली. मुलींचा एकूण निकाल ९६.९१ टक्के तर मुलांचा निकाल ९३.९० टक्के इतका लागला आहे. दरम्यान, निकालात कोकण विभागानं बाजी मारली असून औरंगाबाद विभागाचा निकाल सर्वात सर्वात कमी लागला आहे.

कोणत्या विभागाचा किती निकाल

कोकण – ९८.७७ टक्के

पुणे – ९७.३४ टक्के

नागपूर – ९३.८४ टक्के

औरंगाबाद – ९२ टक्के

मुंबई – ९६.७२ टक्के

कोल्हापूर – ९७.६४ टक्के

अमरावती – ९५.१४ टक्के

नाशिक – ९३.७३ टक्के

लातूर – ९३.०९ टक्के


विभागनिहाय विद्यार्थी संख्या पुढील प्रमाणे –

पुणे : २ लाख ८५ हजार ६४२ विद्यार्थी, नागपूर : १ लाख ८४ हजार ७९५ विद्यार्थी, औरंगाबाद : २ लाख १ हजार ५७२ विद्यार्थी, मुंबई : ३ लाख ९१ हजार ९९१ विद्यार्थी, कोल्हापूर : १ लाख ४३ हजार ५२४ विद्यार्थी, अमरावती : १ लाख ८८ हजार ७४ विद्यार्थी, नाशिक : २ लाख १६ हजार ३७५ विद्यार्थी, लातूर : १ लाख १८ हजार २८८ विद्यार्थी, कोकण : ३५ हजार ६३७ विद्यार्थी.

कुठे पाहाल निकाल ?

mahresults.nic.in
maharashtraeducation.com
results.mkcl.org
mahahsscboard.maharashtra.gov.in

कसा पाहाल निकाल?

– दहावीचा निकाल पाहण्यासाठी वरती दिलेल्या संकेतस्थळावर जा.
– त्यानंतर Maharashtra SSC Result 2020 रिझल्ट लिंकवर क्लिक करा.
– त्यानंतर आपला रोल नंबर, नाव आणि आईचं नाव टाकून एंटर करा.
– Maharashtra MSBSHSE SSC 10th Result 2020 निकाल आपल्या स्क्रिनवर असेल.
– तुम्ही निकालाची प्रिंट काढू शकता.

गुणपडताळणीसाठी दुसऱ्या दिवशी अर्ज

ऑनलाइन निकाल लागल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून विद्यार्थ्यांना अनिवार्य विषयांची गुणपडताळणी, उत्तरप्रत्रिकांच्या छायाप्रती पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाइन अर्ज करता येईल. यासाठी http://verification.mh-ssc.ac.in या वेबसाईटवर अथवा शाळेमार्फत अर्ज करता येऊ शकेल. गुणपडताळणीसाठी ३० जुलै ते ८ ऑगस्टदरम्य़ान अर्ज करता येणार आहे. तसंच छायाप्रतीसाठी अर्ज करण्याची मुदत ही ३० जुलै ते १८ ऑगस्ट ही असेल.