गेल्या वर्षभरापासून जगभरात करोनाचा थैमान मांडलं आहे. अनेक भागांमध्ये करोना विषाणूचा प्रसार झाला आहे. पण महाराष्ट्राचं एक असं गाव होतं जिथे गेल्या वर्षभरापासून एकही करोना रुग्ण आढळला नव्हता. मात्र ५ दिवसांपूर्वी करोनाने या गावात शिरकाव केला आहे. गेल्या वर्षी सर्वत्र करोनाचा उद्रेक झाल्यापासून महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील खरातवाडी गावात एकाही व्यक्तीला करोनाची लागण झाली नव्हती. मात्र पाच दिवसांपूर्वी एका कुटुंबातील पाच सदस्यांची चाचणी पॉझिटिव्ह आल्याने गावातील परिस्थिती बदलली. “गेल्या काही दिवसांत गावात कोविड रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या वर्षी करोनाचा उद्रेक झाल्यानंतर गावात पाच जणांना लागण होण्याची ही पहिलीच वेळ आहे. सर्व एकाच कुटुंबातील आहेत," अशी माहिती नेर्ले येथील शासकीय वैद्यकीय अधिकारी सागर शिंदे यांनी दिली. शिंदे म्हणाले की खरातवाडी येथे आजपर्यंत एकही करोना रुग्ण आढळला नाही. तर याच काळात शेजारच्या दोन खेड्यांमध्ये १०० पेक्षा जास्त करोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. वर्षभरात ३०० चाचण्या करण्यात आल्या त्यापैकी आता केवळ पाच जणांच्या चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत असे शिंदे यांनी सांगितले. १२००च्या आसपास या गावची लोकसंख्या आहे. “लोक इथे मोठ्या शेतात राहतात. त्यामुळे गर्दी होत नाही. गावकऱ्यांच्या मालकीचे शेत आहेत जिथे त्यांनी स्वतःची घरे बनवली आहेत आणि आपल्या कुटुंबासमवेत राहतात, त्यामुळे गावात करोनाचा शिरकाव झाला नाही” सरपंच पृथ्वीराज खरात यांनी सांगितले. "गावात करोनाविषयी जागरुकता मोहीम राबविली आणि गावकऱ्यांना लक्षणे आढळल्यास तपासणी करण्यास सांगितले,” असे सरपंचानी सांगितले. गावात येणाऱ्या प्रत्येकाची करोना चाचणी करण्यात येत होती हे गावाला करोनामुक्त ठेवण्याचे मुख्य कारण होतं असं शिंदे यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीत खरातवाडीतील शेतकऱ्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांना उघड पाठिंबा दिला होता.