माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी आभासी पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेला आम्ही प्रत्यक्ष उत्तर देतो आहोत असा टोला लगावत परिवहन मंत्री अनिल परब यांनी महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत लगावला. आभासी चित्राला आम्ही थेट उत्तर देत आहोत असं परब यांनी म्हटलं आहे. सुरुवातीला सगळा खर्च आम्हीच करु असं केंद्राने सांगितलं होतं. मात्र तसं काहीही नाही असंही परब यांनी स्पष्ट केलं. विरोधकांनी कितीही प्रयत्न केले तरीही आम्ही आमची मानसिकता ढळू देणार नाही असंही स्पष्ट करण्यात आलं. आम्हाला कर्ज घेण्यासाठी कुणीही सल्ले देऊ नये असंही परब यांनी स्पष्ट केलं.

गहू, तांदूळ आणि डाळ यांची मदत केंद्राने महाराष्ट्राला केली. १७५० कोटींचे गहू आम्हाला देण्यात आला आहे असा दावा फडणवीस यांनी केला तो खोटा आहे. कारण हे गहू अद्याप महाराष्ट्राला मिळालेले नाहीत असंही परब यांनी सांगितलं.  स्थलांतरित मजुरांना पैसे देण्याचा निर्णय चार दिवसांपूर्वीच झाला आहे असंही अनिल परब यांनी सांगितलं.

आणखी वाचा- फडणवीसांच्या दाव्याची ठाकरे सरकारकडून पोलखोल; रेल्वेचा संपूर्ण खर्च राज्यानं केला – अनिल परब

भाजपाकडून आम्हाला सहकार्याची अपेक्षा होती. मात्र विरोधक या परिस्थितीचा फायदा घेऊन अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत केला. करोनाच्या काळात त्यांच्याकडून सहकार्याची अपेक्षा होती. मात्र ते राजकारण करत आहेत असंही थोरात यांनी स्पष्ट केलं. तसंच मजुरांच्या तिकिटांचा खर्चही राज्य सरकारनेच केला असंही बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं. विरोधक सहकार्याऐवजी संभ्रम निर्माण करत आहेत असंही थोरात म्हणाले.

आणखी वाचा- भाजपा महाराष्ट्राचा मित्र आहे की शत्रू?- जयंत पाटील

करोनाचं संकट संपूर्ण जगावर आहे. करोनाच्या संकटाशी महाराष्ट्रशी लढतो आहे. २५ मार्च पासून केंद्र सरकारने लॉकडाउन जाहीर केला या लॉकडाउनला दोन महिने होऊन गेले आहेत. या सगळ्या परिस्थितीत महाविकास आघाडी समर्थपणे काम करते आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली योग्य पद्धतीने लढा देणं सुरु आहे. महाराष्ट्रात स्थलांतरित मजुरांची संख्याही खूप मोठी आहे. महाराष्ट्र हे देशाचं व्यवसाय केंद्र आहे. आजही सात लाख लोकांना आपण भोजन देतो आहोत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. महाविकास आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

स्वयंसेवी संस्था, पक्ष कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते यांची सरकारला करोना काळात मोलाची मदत होते आहे. मुंबईची स्थिती सध्या काळजी करावी अशीच आहे. करोनाच्या संकटातून आपण अजूनही बाहेर पडलेलो नाही. मात्र कुणाचीच गैरसोय होऊ नये आपण कार्य करतो आहोत.