आमच्या जिवाला धोका आहे. त्यामुळे आमची सुरक्षा वाढवा, अशी मागणी महाविकास आघाडीतील दोन मंत्र्यांनी केली आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आपल्या जिवाला धोका असल्याचं मंत्रिमंडळाच्या बैठकीत म्हटलेय. ठाकरे सरकारमधील या दोन मंत्र्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुरक्षेत वाढ करण्याची मागणी केली आहे. सरकार माजी मंत्र्यांना सुरक्षा पुरवतं, मग आजी मंत्र्यांना आवश्यक सुरक्षा हवी, असं या मंत्र्यांचं म्हणणं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुरक्षेचा आढावा घेऊन निर्णय घेणार असल्याचं म्हटलं आहे.

गेल्या वर्षी जानेवारी २०१९ मध्ये फडणवीस सरकारने आव्हाडांची सुरक्षाव्यवस्था कपात केली होती. निवडणुकीच्या कारणामुळे सुरक्षा काढली होती.२०१८ मध्येही आव्हाडांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली होती. आव्हाड हे सनातन संस्थेच्या हिटलिस्टवर असल्याचं गुप्तचर यंत्रणेने स्पष्ट करुनही तत्कालिन भाजपा सरकार राजकारण करत असल्याचा आरोप राष्ट्रवादीने फडणवीस सरकारवर केला होता. तर गडचिरोली जिलह्यात जिल्ह्यात नक्षलवाद्यांचा धोका आहे, त्यामुळे सुरक्षा व्यवस्थेत वाढ करावी, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.