दोन दिवसांपूर्वी निधन झालेल्या नातेवाईकाचं रक्षाविसर्जन करून परत येत असताना मालवाहू गाडीचा भीषण अपघात होऊन आठ जण जागीच ठार झाले आहेत. तर १९ जण जखमी झाले आहेत. आज (रविवारी) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास कळंब तालुक्यातील जोडमोहानजीक वाढोणा गावाजवळ ही घटना घडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जोडमोहा येथील नातेवाईक बाबाराव वानखडे यांचे दोन दिवसांपूर्वी निधन झाले होते. त्यांची रक्षा विसर्जित करुन काही नातेवाईक टाटा मॅजिक या मालवाहू गाडीने कोटेश्वर येथे गेले होते. तेथून परत येत असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्यालगत झाडाला धडक देऊन वाहन पलटी झाले. या भीषण अपघातात महादेव बावनकर (वय ५३, रा. शेंदुरजनाघाट), किसन कळसकर (वय ५५), महादेव चंदनकर (वय ५८), वाहनचालक अमर आत्राम (वय ३२) तिघेही राहणार जोडमोहा आणि गणेश चिंचाळकर (वय ५२, रा. महागाव), अंजना वानखडे (वय ६०) सरस्वती दाभेकर (वय ६०) दोघीही राहणार जोडमोहा, संभाजी मेश्राम अशी मृतांची नावे आहेत. अपघातात इतर सहा जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यासह १३ जण किरकोळ जखमींना यवतमाळात शासकीय रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.

गावात पोहोचण्यापूर्वी केवळ दोन किलोमीटर आधी हा अपघात झाला. या भीषण अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. अपघाताची माहिती कळताच गावकऱ्यांनी मदतीसाठी धाव घेतली. या घटनेने जोडमोहा येथे शोककळा पसरली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Major accident happened in yavatmals vadhona six people were killed on the spot aau
First published on: 16-02-2020 at 20:30 IST