पूर्व विदर्भातील शेततळी, प्रकल्पही निम्मे भरले

उन्हाळ्यात उष्णतेच्या तीव्र लाटेमुळे कोरडे ठणठणीत पडलेले पूर्व विदर्भाच्या पाचही जिल्ह्य़ातील ५ हजार ९५७ माजी मालगुजारी (मामा) तलाव गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तुडूंब भरले आहेत. केवळ हे तलावच नाही, तर शेततळे व सिंचन प्रकल्पही निम्म्यावर भरले आहेत.

पूर्व विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्य़ात १६७८, गडचिरोली १६४५, नागपूर २१७, भंडारा १०२१ व गोंदिया १३९२, असे एकूण ५ हजार ९५७ मामा तलाव आहेत. यंदाच्या उन्हाळ्यात बहुतांश मामा तलाव आटलेले होते, त्यामुळे गावकरी व शेतकऱ्यांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागला होता, परंतु गेल्या चार दिवसांपासून पूर्व विदर्भासह चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्य़ात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सर्व मामा तलाव, तसेच शासनाच्या मदतीने शेतकऱ्यांनी शेतात खोदलेली शेततळीही तुडूंब भरलेली आहेत. विशेष म्हणजे, यंदा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पूर्व विदर्भातील मामा तलावांची देखभाल व दुरुस्ती, तसेच गाळ काढण्यासाठी १०० कोटींचा निधी दिलेला होता. याचा पुरेपूर वापर करून त्यातल्या त्यात चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्य़ातील बहुतांश मामा तलावांमधील गाळ उपसून त्याची दुरुस्तीही करण्यात आली. त्यामुळे त्यांची साठवणूक क्षमता वाढलेली आहे. चंद्रपूर-नागपूर मार्गावरील घोडपेठ येथे याच दुरुस्ती अंतर्गत मामा तलावाची दुरुस्ती करण्यात आलेली होती. आज हा तलाव तुडूंब भरलेला दिसत आहे. तिच स्थिती चंद्रपूर-मूल मार्गावरील चिचपल्ली, लोहारातीलही आहे. या दोन्ही ठिकाणचे तलाव तुडूंब भरलेले आहेत.

केवळ हेच नाही, तर प्रसिध्द समाजसेवक व लोकबिरादरी प्रकल्पाचे डॉ. प्रकाश आमटे यांचे चिरंजीव अनिकेत आमटे यांनी भामरागडलगत, तर सर्चचे संस्थापक डॉ. अभय बंग यांनीही सर्च परिसरात मोठा तलाव खोदला होता. तेही पाण्याने तुडूंब भरलेले आहेत. आज या तलावातील पाणी लगतच्या गावातील शेतकरी व गावकऱ्यांना वापरता येणार असून पाण्यासाठी भटकंती होईल. हेच नाही तर राज्य सरकारने यंदा जलसंधारण कार्यक्रमांतर्गत जलयुक्त शिवार व शेततळ्यांचा कार्यकम मोठय़ा प्रमाणात राबविला होता. कृषी विभागाच्या मदतीने जेथे जेथे शेततळी खोदण्यात आली आहेत ती सर्व तुडूंब भरलेली आहेत. हा पाऊस सर्वदूर असल्यामुळे पूर्व विदर्भात असे सुखावह चित्र दिसत आहे.

पूर्व विदर्भातील सर्वात मोठय़ा गोसीखुर्द प्रकल्पाचा ओव्हरफ्लो झाला आहे. या धरणाचे ३३ दरवाजे उघडण्यात आल्याने सर्वत्र पाणीच पाणी आहे. यासोबतच चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्य़ातील सर्व सिंचन प्रकल्पही तुडूंब भरले आहेत. चंद्रपूर जिल्ह्य़ातील १२ पैकी दिना व नलेश्वर हे दोन प्रकल्प शंभर टक्के, तर उर्वरीत प्रकल्प ५० टक्क्यांपेक्षा अधिक भरलेले आहेत. इरई धरण ७२.०४, आसोलामेंढा ८०.६१, घोडाझरी ५१.३५, चंदई ७८.३६, चारगाव ७०.४२, अंमलनाला २७.२४, लभानसराड ७०.८५, पकडीगुडम १२.२९ व डोंगरगांव ४९.४२ टक्के भरलेला आहे.