अकोला : कौटुंबिक वादातून जावयाने पत्नीसह सासरा व मेव्हण्यावर कोयत्याने वार करून त्यांची हत्या केली. ही घटना बाळापूर शहरात बुधवारी मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे बाळापूर शहर हादरले असून, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

बार्शिटाकळी तालुक्यातील एरंडा-पारंडा येथील सै. फिरोज से रज्जाक हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याने त्याची पत्नी बाळापूर येथे माहेरी राहत होती. तिचे आईवडील देखील तिला सासरी पाठवत नव्हते. पत्नी माहेरी राहत असल्याने फिरोज व त्याच्या सासरच्यांशी वाद सुरू  होता. तो बुधवारी विकोपाला गेला. आरोपीला सात आणि पाच वर्षांच्या दोन मुली आहेत.त्या त्याच्याकडे राहत होत्या.

बुधवारी सायंकाळी तो मुलींना घेऊन सासरी (बाळापूर) आला. यावेळी त्याने सोबत चाकू व पेट्रोल आणले होते. पत्नीला परत चल असे तो म्हणत होता. परंतु तिने नकार दिल्याने त्याने शेख मेहबूब खान (६५, सासरा), फिरोज मेहबूब खान (२७, मेव्हणा), शबाना मेहबूब खान (३०,पत्नी) यांच्यावर कोयत्याने वार केले. यामध्ये एकाचा घटनास्थळी मृत्यू झाला, तर अन्य दोन जणांना उपचारार्थ सवरेपचार रुग्णालयात पाठवण्यात आले. तेथे त्यांचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच बाळापूरचे ठाणेदार विनोद ठाकरे  ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक केली. पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, अपर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, उपविभागीय पोलीस अधिकारी सोहेल शेख यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली.