बाजारपेठेवर अनिश्चिततेचे सावट; शासनाने वितरण व विक्री व्यवस्था करण्याची मागणी हर्षद कशाळकर करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कोकणातील आंबा बागायतदार धास्तावले आहेत. कोकणात आंबा हंगामाची सुरवात झाली आहे. आंबा विक्रीसाठी तयार आहे. पण खरेदीसाठी व्यापारी आणि ग्राहकच मिळत नसल्याचे बागायदारांची मोठी कोंडी झाली आहे. त्यामुळे शासनाने आंब्याच्या वितरण आणि विक्रीसाठी व्यवस्था करावी अशी मागणी बागायतदारांकडून केली जात आहे. रायगड जिल्ह्यात आंबा लागवडीखालील एकुण ४२ हजार हेक्टर क्षेत्र आहे. यापैकी १६ हजार ५०० हेक्टर उत्पादनक्षम क्षेत्र आहे. यातून दरवर्षी जवळपास २१ हजार ४२४ मेट्रीक टन इतके येवढे उत्पादन अपेक्षित असते. फेब्रुवारी महिन्यापासून हा आंबा बाजारात दाखल होण्यास सुरवात होते. यंदा मात्र मार्च महिन्याच्या उत्तरार्धात दाखल होण्यास सुरवात झाली आहे. मात्र करोनाचा प्रादुर्भाव, त्यानंतर संचारबंदी त्यामुळे आंबा बागायतदारांची मोठी कोंडी झाली आहे. सुरुवातीचा हंगाम महत्त्वाचा हंगामाच्या सुरुवातीला बाजारात दाखल होणाऱ्या आंब्याला चांगला दर मिळत असतो. मात्र नेमके याच वेळेस बाजारात अनिश्चिततेच वातावरण तयार झाले आहे. आंब्याच्या खरेदी विक्रीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तयार झालेल्या आंब्याला चांगला दर मिळेल की नाही याची धास्ती बागायतदारांना वाटते आहे. आंब्याचा हंगाम हा अडीच ते तीन महिने चालतो. यातील सुरवातीचा महिनाच बागायदारांसाठी फायदा देणारा असतो. कारण नंतर बाजारात आंब्याची आवक वाढते आणि दर पडत जातात. राज्यात १.८२ लाख हेक्टर आंबा लागवडीखालील क्षेत्र आहे. त्यापासून ५ लाख टन आंबा उत्पादन घेतले जाते. राज्यात बहुतांश भागात आंबा लागवड होत असली यातील ९० टक्के उत्पादन हे एकटय़ा कोकणातून होते. हापूस, पायरी, रत्ना, सिंधू, केसर, राजपुरी आणि वनराज यासारख्या आंब्याच्या प्रजातींचे उत्पादन कोकणातून केले जाते. यातील हापूस आंब्याला देशाविदेशातून मोठी मागणी असते. फेब्रुवारी आणि मार्च मध्ये कोकणातील आंब्याला बाजारात चांगला भाव मिळतो. मात्र आंबा तयार असूनही बाजार पाठवता येत नाही. करोनाच्या प्रादुर्भावामुळे बाजारपेठांमध्ये अनिष्टिद्धr(१५५)तता आहे. खरेदी विक्री थंडावली आहे. हीच परिस्थिती कायम राहीली तर बागायदारांचे मोठे नुकसान होईल. - संदेश पाटील, आंबा बागायतदार. आंब्याच्या वितरण आणि विक्रीची व्यवस्था झाली नाही, तर बागायदारांचे मोठे नुकसान होईल, त्यामुळे राज्यातील प्रमुख शहरांमध्ये आंब्याची वाहतुक करण्यास तसेच विक्री करण्यासाठी शासनाने परवानगी द्यावी आणि आंबा निर्यात सुरु राहील याची खबरदारी घ्यावी. - संजय यादवराव, अध्यक्ष कोकण भुमी प्रतिष्ठान