राज्यात एकीकडे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटरबॉम्बमुळे राजकीय वातावरण कमालीचे तापलेले असताना, आता दुसरीकडे एटीएसला मोठं यश मिळालं आहे. मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात दोन जणांना अटक करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे एटीएसचे डीआयजी शिवदीप लांडे यांनी एक विशेष फेसबुक पोस्ट करून, माहिती दिली आहे.

शिवदीप लांडे आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, अतिसंवेदनशील मनसूख हिरेन हत्या प्रकरणाचा गुंता सुटला आहे. मी आपल्या संपूर्ण एटीएस पोलीस दलातील सर्व सहकाऱ्यांना मनापासून सॅल्यूट करतो, ज्यांनी मागील अनेक दिवसांपासून दिवसरात्र एक करून, या प्रकरणाचा न्यायपूर्णरित्या छडा लावला. ही केस माझ्या करिअरमधील आतापर्यंतच्या सर्वात कठीण केस पैकी एक होती.

Mansukh Hiren : मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात ATS ने केली २ व्यक्तींना अटक!

हिरेन हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या या दोघांना अगोदर चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं होतं. मात्र, चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आल्याची माहिती एएनआयनं दिली . निलंबित पोलीस हवालदार विनायक शिंदे आणि बुकी नरेश धरे या दोघांना एटीएसनं अटक केली आहे. मनसुख हिरेन यांचा मृतदेह ठाण्याच्या खाडीत सापडला होता. मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर ठेवण्यात आलेल्या स्कॉर्पिओ कारमध्ये जिलेटिनच्या कांड्या सापडल्यामुळे खळबळ उडाली होती. या कारमुळे मनसुख हिरेन यांचं नाव या प्रकरणाशी जोडलं गेलं आणि त्यांचाच संशयास्पदरीत्या मृत्यू झाल्यामुळे या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं.