कोल्हापूर : यंदाची ऊस परिषद कोणत्याही परिस्थितीत घेणारच आहोत. परिषदेत यंदाच्या हंगामाचा उस दराचा निर्णय झाल्याशिवाय साखर कारखानदारांनी धुराडे पेटवू नये, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी बुधवारी दिला. ऊस परिषदेची तारीख नंतर जाहीरकरण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले..

चालू वर्षीच्या उस गळीत हंगामाचा बिगुल वाजू लागला आहे. या पार्श्वभुमीवर चालू वर्षी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने घेण्यात येणा-या ऊस परिषदेच्या नियोजनाबाबत सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी यांची शिरोळ येथील शेटटी यांच्या निवासस्थानी बैठक घेण्यात आली. प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील, राजकीय व्यवहार समितीचे अध्यक्ष सावकर मादनाईक, विठ्ठल मोरे, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील, सांगली जिल्हाध्यक्ष पोपट मोरे, महेश खराडे, वैभव कांबळे यांचेसह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

एफआरपी तुकडयाने देण्यास विरोध
यावेळी शेट्टी म्हणाले, येत्या आठवड्याभरात दोन्ही जिल्ह्यातील पदाधिकारी यांनी गावोगावी शेतकऱ्यांची बैठक घेऊन १९ व्या ऊस परिषदेची तयारी करावी. बैठकीमध्ये साखर कारखान्याकडून तीन टप्यात एफआरपी देण्याबाबत शेतकऱ्यांवर दबाव टाकून सह्या घेतल्या आहेत. कार्यकर्त्यांनी संघटनेच्यावतीने शेतकऱ्यांना एक रकमी एफआरपी मिळण्यासाठी साखर आयुक्तांकडे अर्ज पाठवण्याचे आवाहन करावे. सरकारने बहुतांशी व्यवसाय-उद्योग सुरू करण्यास परवानगी दिली आहे. याच धर्तीवर ऊस परिषदेला परवानगी द्यावी, अशी मागणी शेटटी यांनी केली.