मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीस राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी मान्यता दिल्यानंतर राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात आज (शनिवारी, १ डिसेंबर) राजपत्र जारी केले आहे. यामुळे आजपासून राज्यात १६ टक्के मराठा आरक्षण लागू झाले असून राज्यातील एकूण आरक्षणाचे प्रमाण ६८ टक्क्यांवर पोहोचले आहे. मराठा समाजास १६ टक्के आरक्षण देण्याच्या विधेयकास विधिमंडळाने गुरुवारी एकमुखी मान्यता दिली. यानंतर राज्यभरात आनंदोत्सव साजरा होत आहे. शुक्रवारी संध्याकाळी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी या विधेयकावर स्वाक्षरी केली होती. मराठा समाजासाठी सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग निर्माण करत शिक्षण आणि नोकरीत १६ आरक्षण देण्यात आले आहे. राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतर शनिवारी राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात राजपत्र जारी केले आहे. यानुसार आजपासून राज्यात मराठा आरक्षण लागू झाले आहे. राज्यातील आरक्षणाची सद्यस्थिती महाराष्ट्रात एकूण ५२ टक्के आरक्षण लागू होते. यात आता मराठा आरक्षणाची (१६ टक्के) भर पडली आङे. त्यामुळे आरक्षणाचे प्रमाण ६८ टक्क्यांवर पोहोचले आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा आधार घेत या निर्णयाला कोर्टात आव्हान दिले जाऊ शकते. यामुळे सरकारने या कायद्यासाठी न्यायालयीन लढाईची व्यूहनिती आखली आहे. कोर्टाने परस्पर निर्णय घेऊ नये आणि स्थगिती देऊ नये यासाठी सरकारने कॅव्हेट दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.