छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक अरबी समुद्रातच व्हावे आणि मराठा समाजास आरक्षण मिळावे अश्या मागण्या करीत सर्वपक्षीय आमदारांनी विधानभवन परिसर मंगळवारी दणाणून सोडला. त्यावर या दोन्ही मुद्दय़ांवर अधिवेशन काळातच मुख्यमंत्र्यांच्या समवेत बैठक बोलावून या प्रश्नावर तोडगा काढण्याचे आश्वासन सभापती शिवाजीराव देशमुख यांनी विधान परिषदेत दिले.
मराठा समाजास २५ टक्के आरक्षण देण्याची तसेच खुल्या वर्गातील जातींना आर्थिक निकषावर आधारित नोकरी आणि शैक्षणिक आरक्षण देण्याची मागणी करत मराठा समाजातील सर्वपक्षीय आमदारांनी विधानभवनाच्या परिसरात धरणे आंदोलन केले. तर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाबाबत सरकार गंभीर नाही. अन्य महापुरुषांच्या स्मारकासाठी  नियमांचे अडथळे दूर करण्यात आले. मग हाच नियम महाराजांच्या स्मारकासाठी का लावला जात नाही, असा सवाल आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी केला. यासंदर्भात सभापतींनीच आपल्या दालनात या विषयावर बैठक  बोलवावी, अशी विनंती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. त्यावर शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्यास राज्य सरकारने सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे मत सभापती देशमुख यांनी व्यक्त केले.