सर्वोच्च न्यायालयानं शिक्षण व नोकऱ्यांमध्ये मराठा आरक्षण लागू करण्यास नकार दिल्यानंतर हा मुद्दा राज्यात पुन्हा एकदा तापला आहे. त्यातच तात्पुरती स्थगिती उठवण्यासंदर्भातील सुनावणी वेळी राज्य सरकारचे वकील गैरहजर राहिल्यानं ठाकरे सरकार टीकचं धनी ठरल आहे. याच मुद्यावरून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर बेजबाबदारपणाचा आरोप करत टीका केली आहे. चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करत अशोक चव्हाण यांच्यावर निशाणा साधला आहे. "मराठा समाजाला आरक्षण देऊन आपल्या युवकांचे भविष्य सुरक्षित करणे हे आपल्या राज्यासमोरील मोठे आव्हान आहे. शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया रखडली आहे. एमपीएससी परीक्षा होत नाही आहे आणि हे सर्व केवळ आणि केवळ राज्य सरकारच्या ढिसाळ कारभारामुळे होत आहे. राज्य सरकार बोलत एक आहे आणि करत एक आहे. आपल्या भवितव्यावर टांगती तलवार आहे, हे पाहून काही तरुण टोकाचा निर्णय घेत आहेत. आज सर्वोच्च न्यायालयामध्ये जी काही घटना घडली. त्यावरून एकच विचार डोक्यात येतो. इतका संवेदनशील विषय असून, देखील राज्य सरकार इतके बेजबाबदारपणे कसे काय वागू शकते?," असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला आहे. आणखी वाचा- “ठाकरे सरकार मराठा समाजाच्या उद्रेकाची वाट पाहतंय का?” "तात्पुरती स्थगिती उठवण्यात संदर्भातली सुनावणी अचानक ठरलेली नव्हती. ती पूर्वनियोजित होती. तरी देखील इतक्या महत्वाच्या विषयासंदर्भातील सुनावणीदरम्यान राज्य सरकारतर्फे नेमण्यात आलेला वकील गैरहजर असणे, याहून दुसरे बेजबाबदारपणाचे उदाहरण शोधून सापडणार नाही. तांत्रिक अडचणींमुळे वकील गैरहजर राहिला, असे बाळबोध स्पष्टीकरण अशोक चव्हाण यांनी दिले. त्यांच्या स्पष्टीकरणावरुन आणि एकंदरीत कारभारावरून त्यांना मराठा समाजाप्रती किती आत्मीयता आहे हे दिसून येते," असा टोला पाटील यांनी चव्हाण यांना लगावला आहे. तांत्रिक अडचणींमुळे वकील गैरहजर राहिला असे बाळबोध स्पष्टीकरण अशोक चव्हाण यांनी दिले. त्यांच्या स्पष्टीकरणावरुन आणि एकंदरीत कारभारावरून त्यांना मराठा समाजाप्रती किती आत्मीयता आहे हे दिसून येते. — Chandrakant Patil (@ChDadaPatil) October 27, 2020 आणखी वाचा- “दीड महिना वाया का घालवला? घटनापीठाची मागणी आधीच का नाही?” "आपण सर्व भूतकाळात जेव्हा डोकावतो तेव्हा समजते की काँग्रेसला कधीही मराठा समाजाला आरक्षण द्यायचे नव्हते आणि आताही द्यायचे नाही. सुनावणीदरम्यान वकील उपस्थित नसणे, हा त्याच एका कटकारस्थानाचा भाग आहे. परंतु जनता सुजाण आहे, ती असल्या कटकारस्थानांना कधीच बळी पडणार नाही," असं पाटील यांनी म्हटलं आहे.