मराठीचा वाडा म्हणजे मराठवाडा. त्यामुळे मराठी भाषेचे विद्यापीठ याच भागात उभे राहावे, असे वाटते. गुनाढय़ाची बृहत्कथा आणि लिळाचरित्रातून मराठीच्या जन्माचे पुरावे याच भागात असल्याने मराठी विद्यापीठासाठी प्रस्ताव तयार करा. मंजुरी देऊ, असे आश्वासन सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी केले. संत एकनाथ, चक्रधर स्वामी आणि सुफी संतांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या पैठणनगरीत ३४ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे शनिवारी उद्घाटन झाले. त्या प्रसंगी ते बोलत होते.
ठालेंची टोलेबाजी, टोपेंची दिलगिरी!
उद्घाटन सत्रात मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी नेत्यांवर जोरदार टीका केली. मराठी भाषेची अवहेलना कशी केली जाते, याचे उदाहरण देताना त्यांनी मंत्री टोपे यांना लक्ष्य केले. ते म्हणाले, की लोकसाहित्यातील मराठीचा अभ्यास करणारी समिती सरकारने १९६१ मध्ये स्थापन केली. नंतर सरकारने ही समितीच गुंडाळून ठेवली. दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर त्यांनी पुनर्रचना केली. पण विभाग संचालकांनी समितीतील सदस्यांना मदत मिळू दिली नाही. नंतर सरकार गेले व समितीही बरखास्त झाली. पुढे उच्च व तंत्रशिक्षण पदाचा कारभार राजेश टोपे यांनी मराठी लोकवाङ्मय समितीच्या अध्यक्षपदी हिंदीचे प्रा. केशव फाळके यांची नियुक्ती केली. जालना जिल्ह्य़ातील याच विषयातील दोन प्राध्यापकांची वर्णीही समितीवर लावली. एवढे करूनही समितीतील सदस्यांना ना बसायला जागा आहे, ना कर्मचारी. अध्यक्षांनाही अपमानजनक वागणूक दिली जाते. मंत्रिमहोदयांना हे सगळे पत्रातून कळवूनही त्याची साधी पोच मिळाली नाही. चर्चा करण्यासाठी मंत्र्यांना दोन-चार मिनिटांचा वेळही मिळाला नाही.

भुजबळांना भाषणाची घाई
ठाले पाटील यांच्यानंतर बोलणारे टोपे यांचा  बराच वेळ त्यांच्यावर व कारभारावर झालेल्या टीकेचा खुलासा करण्यात गेला. तरीही पैठणचा इतिहास नि वाङ्मयीन चळवळीची खुलासेवार माहिती ते देत होते. त्यामुळे भुजबळ अस्वस्थ झाले.त्यांना लवकर जावयाचे असल्याने व्यासपीठावरच चिठ्ठी लिहिली व टोपेंपर्यंत पोहोचवल्यावर भाषण थांबविले आणि भुजबळ उठून उभे राहिले.  घाईत सूत्रसंचालक म्हणाला, समता परिषदेच्या कार्यकर्त्यांना सत्कार करायचा आहे. भुजबळांनी ‘नंतर-नंतर’ असा हाताचा इशाराही केला आणि ते भाषणाला उभे राहिले.