मराठवाडय़ातील ४८पकी १९ मतदारसंघ महायुतीत भाजपाकडे आहेत. महायुतीची बोलणी सुरू आहे. महायुती व्हावी ही सर्वाचीच इच्छा आहे, तरीदेखील मराठवाडय़ातील सर्व ४८ मतदारसंघांत उमेदवारी दाखल करण्यास भाजपाने यंत्रणा सज्ज केली आहे. तसे आदेश संबंधित जिल्हाध्यक्षांना देण्यात आल्याचे निवडणुकीतील मराठवाडय़ाचे समन्वयक केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी स्पष्ट केले.
अहमदपूर, उदगीर, निलंगा व लातूर ग्रामीण या भाजपकडील ४ मतदारसंघांतील बुथ मेळाव्यात दानवे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. केंद्रात भाजपचे सरकार आहे. मराठवाडय़ात भाजपचा विस्तार व्हावा, या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. मराठवाडय़ात भाजपाच्या १९पकी ९ जागा केवळ बीड व लातूर या दोन जिल्हय़ांत असून, उर्वरित ६ जिल्हय़ांत केवळ १० जागा आहेत. मराठवाडय़ात भाजपची शक्ती शिवसेनेपेक्षा अधिक असल्यामुळे भाजपला जागा वाढवून मिळाव्यात, अशी मराठवाडय़ातील कार्यकर्त्यांचीही इच्छा आहे. केंद्रीय नेतृत्व यासंबंधी निर्णय घेईल. निवडणुकीच्या तयारीसाठी भाजपचे कार्यकत्रे सज्ज असल्याचे दानवे यांनी सांगितले.
‘राज्य सरकारने केंद्राकडे ७०० कोटी परत पाठवले’
केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारला गेल्या १०० दिवसांत सिंचनासाठी १ हजार ४०० कोटी रुपये देऊ केले होते. मात्र, राज्यात सिंचनाची कामे पूर्ण झाल्याचे सांगत राज्य सरकारने ७०० कोटी रुपये केंद्र सरकारला परत पाठवले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे विकासाच्या अनेक संकल्पना आहेत. आगामी काळात कोटय़वधी रुपये राज्य सरकारला दिले जातील. मात्र, राज्य सरकार केंद्राकडे पसे परत पाठवणार असेल तर ते सरकार महाराष्ट्राच्या हिताचे नाही हे लक्षात घेऊन राज्यात सत्ताबदल करण्याचे आवाहन दानवे यांनी केले.