अवकाळी पावसाचे प्रमाण यंदा चांगलेच वाढले असून, त्याचा विवाह सोहळय़ांना फटका बसत असल्याचे चित्र आहे. मोकळय़ा मदानावर आयोजित केल्या जाणाऱ्या धनिकांच्या विवाह सोहळय़ांना सर्वाधिक फटका बसत आहे.
विवाह समारंभावरील खर्च कमी व्हावा, सोहळे मर्यादित असावेत अशी चर्चा वारंवार होत असली, तरी दरवर्षी मोठय़ा संख्येने विवाह सोहळय़ावरील खर्च वाढतच चालला आहे. मोठय़ा शहरांमध्ये मंगल कार्यालयात होणाऱ्या विवाह सोहळय़ांमध्ये वऱ्हाडींची संख्या पाचशे ते अडीच हजारांच्या दरम्यान असते. यंदा अवकाळी पावसाचे प्रमाण बऱ्यापैकी वाढले. अवकाळीची वेळ साधारण सायंकाळची असते. नेमक्या त्याच वेळी गोरज मुहूर्तावर विवाह, स्वागत समारंभ आयोजित केलेला असतो. अवकाळीमुळे आयोजकांसह उपस्थितांची मोठी त्रेधातिरपीट उडते.
विवाह निश्चितीनंतर जागेसाठी ऐनवेळी धावाधाव नको, म्हणून किमान ४ महिने आधी स्थळाची निश्चिती केली जाते. परंतु ऐनवेळी स्थळ बदलायचे ठरवले, तरी दुसरी जागा मिळणे लगेच शक्य नसल्यामुळे आहे त्या स्थितीला तोंड देण्याची वेळ आयोजकांवर येते. जिल्हय़ात मोकळय़ा मदानावर मोठय़ा संख्येचे विवाह सोहळय़ांचे प्रमाणही लक्षणीय वाढले आहे. अवकाळी पावसामुळे मंडप पडणे, मदानावर चिखल होणे याबरोबरच आलेल्या मंडळींची भोजनव्यवस्था पूर्ण कोलमडून पडते. गेल्या दोन महिन्यांत अनेक ठिकाणी वावटळीमुळे शिजवलेल्या अन्नाची नासाडी होण्याचे प्रकार वाढले आहेत. मे महिन्यात ६, जून महिन्यात १४ व जुलै महिन्यात ३ असे आणखी विवाहाचे २३ मुहूर्त शिल्लक आहेत. मान्सूनचे आगमन कधी होईल, यापेक्षा अवकाळी केव्हा येईल हे सांगता येणे अवघड झाले आहे. त्यामुळे ‘दुधात मिठाचा खडा’ पडल्यानंतर होते ती अवस्था अवकाळी पावसाने विवाह सोहळय़ाची करून टाकली आहे.