चंद्रपूर : लग्न झालेले असतानाही प्रेमसंबंध कायम ठेवणाऱ्या प्रेमीयुगुलाने चंद्रपूर-घुग्घुस मार्गावरील पांढरकवडा-शेणगावमधील शिवारात झाडाला गळफास लावूनआत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. त्या दोघांचेही विवाह झाले होते तसेच तरुणीला एक सहा वर्षांचा मुलगाही आहे. मूळचा वर्धा जिल्हय़ातील सेलू येथील रहिवासी राजेश व सुनीता यांचे सात वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र सामाजिक परिस्थिती आणि कुटुंबाच्या विरोधामुळे ते लग्न करू शकले नाहीत. त्यानंतरही त्यांच्या गाठीभेटी सुरूच होत्या. दरम्यान, सुनीताचे नकोडा येथील अमित निळे या युवकाशी लग्न झाले आणि तिला एक मुलगा झाला, तर राजेश गेडाम याचेही लग्न झाले. सुनीताचा मुलगा सहा वर्षांचा आहे. त्यानंतरही दोघे भेटत होते. दरम्यान, रविवारी रात्री दहा वाजतापासून दोघेही बेपत्ता होते. त्यांचा शोध कुटुंबीय घेत असतानाच  सोमवारी सकाळी दोघांचेही मृतदेह पांढरकवडा गावाजवळ झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडले. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवले असून घुग्घुस पोलीस तपास करीत आहेत.