मुंबईतही गेल्या आठवडय़ात झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेमुळे देशभर संतापाची लाट उसळली असतानाच रत्नागिरीत याची पुनरावृत्ती घडल्याने संपूर्ण जिल्हा सुन्न झाला आहे. येथील एका गतिमंद तरुणीवर सहा तरुणांनी सामूहिक बलात्कार केल्याचे सोमवारी उघड झाले. या सर्व नराधमांना पोलिसांनी अटक केली असून ग्रामीण पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. १९ ऑगस्ट रोजी रात्री १२ वाजता ही घटना घडली होती.  
विवेक कृष्णा होरंबे, गणेश शंकर होरंबे, सूरज विजय होरंबे, राकेश रवींद्र िशदे, राजन देवजी होरंबे, नितीन धर्मा होरंबे (सर्व रा. पानवल, होरंबे वाडी, ता. जि. रत्नागिरी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. हे तरुण १८ ते १९च्या वयोगटातील आहेत. यातील काही नळदुरुस्तीचे, तर काही वेिल्डगचे काम करतात.
१९ ऑगस्ट या दिवशी रात्री १२ च्या सुमारास पानवल येथील एक गतिमंद तरुणी मुख्य मार्गावरील एसटी शेडमध्ये बसली होती. या दरम्यान काही तरुण पानवल गावातून फिरण्यासाठी आले होते. त्या वेळी त्यांना ही मुलगी दिसली. त्यांनी त्या मुलीला शेडच्या मागे नेले आणि सामूहिक बलात्कार केला. या मुलीचा नातेवाईक योगायोगाने इस्लामपूरहून साधारण त्याच वेळी परतला. त्याला शेडच्या मागे काही संशयास्पद हालचाली दिसल्या. तेथे जाऊन खात्री केली असता हा किळसवाणा प्रकार उघड झाला.
गुन्ह्य़ाची कबुली
या मुलीच्या आईचे दोन दिवसांपूर्वीच आजारपणामुळे निधन झाले आहे. आईवडिलांचे छत्र नसलेल्या या तरुणीला काही महिन्यांपासून वेडाचे झटके येऊ लागल्याने तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. तिच्या नातेवाईकांनी रविवारी रात्री ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी सर्व संशयितांना अटक केली. या सर्वानी गुन्ह्य़ाची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.