करोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे सध्या देशभरातील लोक त्रस्त आहेत. लाखो लोक बेरोजगार झाले आहेत. अनेक जण एक वेळच्या अन्नासाठी देखील संघर्ष करत आहेत. आशा प्रतिकूल परिस्थितीत उद्योजक मिलिंद पोटे यांनी गरीबांसाठी मदतीचा हात पुढे केला. त्यांनी केलेल्या समाजसेवेसाठी त्यांना ‘सूर्यगौरव राष्ट्रीय पुरस्कार २०२०’ या पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे. मिलिंद पोटे समाजसेवा करण्यात नेहमीच पुढाकार घेतात. करोनाग्रस्त वातावरणात त्यांनी गरजुंसाठी अन्न, पाणी आणि निवाऱ्याची सोय केली. गरीब विद्यार्थांना शिक्षणासाठी आर्थिक मदत केली. शिवाय बेरोजगार झालेल्या मजुरांना नोकऱ्या मिळवून देण्यासाठी देखील मदत केली. त्यांच्या या नि:स्वार्थी सामाजिक कार्यासाठी त्यांना ‘सूर्यगौरव राष्ट्रीय पुरस्कार २०२०’ या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. मिलिंद पोटे हे एक यशस्वी उद्योजक आहेत. औरंगाबाद येथे राहणाऱ्या मिलिंद यांनी एका लहानशा कॅफेपासून व्यवसायाची सुरुवात केली होती. आज या कॅफेचं रुपांतर क्विक सर्व्हिस रेस्तरॉमध्ये झालं आहे. आज देशभरात या रेस्तरॉच्या अनेक ब्रांचेस आहेत. आपल्या नाविन्यपूर्ण कल्पनांमुळे त्यांनी हॉटेल इंडस्ट्रीमध्ये स्वत:ची अशी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.