"इतके दिवस झाले तुम्ही राजकारणात आहात. आतापर्यंत तुम्हाच्या कानांना मशिदीवरील भोंग्याचा त्रास झाला नाही का? शिवसेनेमुळे मनसेसाठी जमीन तयार झाली आहे. त्याचा फायदा घेण्यासाठी ते राजकारण करत आहेत, असा आरोप एमआयएमचे खासदार इम्तियाझ जलिल यांनी केला. आम्ही मनसेला घाबरत नाही. आम्ही आजपर्यंत सर्वांनाच शिंगावर घेतलं आहे, असं ते म्हणाले. गुरूवारी मुंबईतील नेस्को संकुलात मनसेचं पहिलं महाअधिवेशन पार पडलं. यावेळी राज ठाकरे यांनी सर्वांनी धर्म आपल्या घरी ठेवावा. मशिदींवर लावण्यात आलेले भोंगे काढावेत, असं ते म्हणाले होते. यावर इम्तियाज जलिल यांनी आपली प्रतिक्रिया दिली. तुम्ही इतके दिवस राजकारणात आहात. आजपर्यंत तुम्हाला मशिदीवरील भोंग्याचा त्रास झाला नाही. राजकारणासाठी या मुद्द्याचा वापर केला जात आहे. शिवसेना सेक्युलर झाल्यानं मनसेसाठी जमीन तयार झाली आहे. त्याचाच फायदा घेण्यासाठी मनसेकडून राजकारण सुरू आहे, असा आरोप त्यांनी केला. आणखी वाचा - आमची आरती त्रास देत नाही तुमचा नमाज का त्रास देतो?- राज ठाकरे राज ठाकरे काय म्हणाले होते? आमची आरती त्रास देत नाही तर तुमचा नमाज का त्रास देतो आहे? असा प्रश्न मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात उपस्थित केला होता. एवढंच नाही तर मशिदींवरचे भोंगे हटवले गेले पाहिजेत ही आपली भूमिका त्यांनी पुन्हा एकदा मांडली. पाकिस्तानी आणि बांगलादेशी मुसलमानांना हाकला हा मुद्दा मी अनेकदा मांडला आहे. जे मुसलमान देशाचा अभिमान बाळगतात त्यांना आम्ही कोणीही नाकारलेलं नाही. नाकारणार नाही. अब्दुल कलाम, झहीर खान यांना आम्ही कधीही नाकारलेलं नाही. कुणीही यायचं आणि इथे यायचं आपला देश म्हणजे काय धर्मशाळा आहे का? असाही प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केला.