गेले पाच दिवस हजारो श्रमिकांना सुरक्षितपणे एसटी बसेसद्वारे राज्याच्या सीमेपर्यंत सुखरूप पोहोचविण्यात येत आहे. राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार एसटी महामंडळ आणि राज्य परिवहन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. विशेषतः एसटी बसेस योग्यप्रकारे सॅनिटाराईज केलेल्या असून, सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे काटेकोर पालन करण्यात येत आहे. त्यामुळे श्रमिकांनी अवैधरित्या व धोकादायक पद्धतीने प्रवास न करता एसटी बसेस मधूनच सुरक्षित प्रवास करावा, असे आवाहन परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष अॅड.अनिल परब यांनी केले आहे.

“गेल्या दोन दिवसात अवैधरित्या प्रवास करणाऱ्या श्रमिकांचे अपघात पाहता राज्य परिवहन विभागाच्या भरारी पथकाद्वारे अशा अवैध व धोकादायक प्रवास करणाऱ्या वाहनांवर कारवाई होऊ शकते,” असं अनिल परब म्हणाले. “एसटी महामंडळ व राज्य परिवहन विभाग यांनी आपली मोहीम अधिक तीव्र केली असून, एसटी व राज्य परिवहन विभागाने स्थानिक जिल्हा प्रशासनाच्या मदतीने आपल्या गावी निघालेल्या श्रमिक-मजुरांचा शोध घेऊन त्यांना तातडीने एसटी बसेस उपलब्ध करून देत आहेत,” असंही ते म्हणाले.

आणखी वाचा- ३१ मे पर्यंत लॉकडाउन वाढवण्यासंदर्भात ठाकरे सरकारचं एकमत

“आज तब्बल १२०० बसद्वारे २७ हजार ५२८ मजुरांना त्यांच्या इच्छित स्थळी सुखरूप पोहोचविण्यात आले आहे. विशेष म्हणजे गेल्या ५ दिवसांत राज्यातील ७२ हजार ९५६ श्रमिकांना या सुरक्षित प्रवासी वाहतुकीचा लाभ झाला आहे.” असेही त्यांनी सांगितले.