भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. शॉक दिल्याशिवाय त्यांची बेताल बडबड थांबणार नाही अशी घणाघाती टीका शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी केली आहे. राज्याचे पाणी पुरवठा मंत्री आणि शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांना किरीट सोमय्यांनी अन्वय नाईक प्रकरणावरुन शिवसेनेवर केलेल्या आरोपांबाबत जेव्हा प्रतिक्रिया विचारली तेव्हा गुलाबराव पाटील यांनी हे वक्तव्य केलं आहे.

नेमकं काय म्हणाले गुलाबराव पाटील?
किरीट सोमय्या हे बेताल बडबड करत आहेत. त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. शॉक दिल्याशिवाय त्यांची ही बडबड थांबणार नाही. त्यांनी ठाण्यातील रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावेत असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे. ठाकरे कुटुंबीयांच्या पायाजवळ बसून किरीट सोमय्या खासदार झाले आज ते ठाकरे कुटुंबावरच टीका करत आहेत. हा माणूस अत्यंत कृतघ्न आहे अशीही टीका गुलाबराव पाटील यांनी जळगावमध्ये बोलताना केली. टीव्ही ९ मराठीशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

काय म्हणाले होते सोमय्या?

“ठाकरे सरकार म्हणजे रिअल इस्टेटमध्ये भूखंडाचं श्रीखंड लाटण्यात गुंतलेलं सरकार दिसत आहे. मी याआधी दहिसर जमीन घोटाळ्याचा विषय काढला होता. संजय राऊत ऐकत असतील तर त्यांनी स्पष्ट ऐकावं. जी जमीन २ कोटी ५५ लाखांत अल्पेश अजमेरा बिल्डरने घेतली ती ९०० कोटीत विकत घेण्यासाठी मुंबई महापालिका निघाली आहे. यामधील ३५४ कोटी आधीच दिले आहेत,” असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.