मराठा आरक्षणावरुन राज्यात वातावरण चांगलचं तापलं आहे. MPSC परीक्षा तात्काळ रद्द करावी, असी मागणी मराठा संघटनाकडूव करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणासह समाजाच्या विविध मागण्यांसाठी आजपासून मराठा क्रांती ठोक मोर्चा काढण्यात येत आहे. या तिसऱ्या पर्वाला तुळजापुरातून सुरुवात झाली. यावेळी संयम कधी सोडायचा माहित आहे, पण गरज पडेल तेव्हा तलवारी काढू, असा इशारा भाजपाचे राज्यसभा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिला. खासदार संभाजीराजे यांच्या या वक्तव्याला मंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राजा रयतेचा असतो, समाजाचा नसतो; तलवार कुणाविरोधात उपसणार?, असा थेट सवाल मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी नाव न घेता संभाजीराजे छत्रपतींना विचारला आहे. शाहू महाराजांनी पुरोगामी विचार मांडले; मग हे राजकारण कशासाठी, असा प्रश्न यावेळी विजय वडेट्टीवारांनी उपस्थित केला. एका समाजासाठी भांडताना दुसऱ्या समाजाचे अहित होता कामा नये. ओबीसीविरोधात, दलितविरोधात, तलवारीची भाषा कशासाठी, असंही वडेट्टीवार म्हणाले आहेत.

आणखी वाचा- वेळ आल्यास मराठा आरक्षणासाठी तलवारही काढेन- संभाजीराजे

राजा रयतेचा असतो… समाजाचा नसतो, तलवार कुणा विरोधात उपसणार? तलवारीची भाषा का? तडजोडीची भाषा असली पाहिजे. एमपीएससी परीक्षेत २०० जागा आहेत. त्यात २३ जागा ह्या मराठा समाजासाठी आहेत. अडीच लाख विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे. वय जात, लग्नाचे प्रश्न असतात. माझी भूमिका विचारली तर परीक्षा व्हावी असे माझे मत आहे. पण त्यात कोणत्याही समाजाचे नुकसान व्हावं अस नाही. मध्य मार्ग काढता येतो , मग हे राजकारण कशाला? शाहू महाराजांनी पुरोगामी विचार मांडले आहेत. एक समाजासाठी भांडताना दुसऱ्या समाजाचे अहित होता कामा नये, असे वडेट्टीवार म्हणाले आहेत.