राज्यात सध्या मराठा आरक्षणावरुन वातावरण पेटलं असून ठिकठिकाणी आंदोलनं सुरु आहेत. दरम्यान आरक्षणाच्या मागणीवरुन धनगर समाजही आक्रमक झाला आहे. आमदार आणि धनगर समाजाचे नेते यांनी आरक्षण मिळालं नाही तर राज्य सरकार आणि धनगर समाजातील संघर्ष अटळ आहे असा इशाराच दिला आहे. गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र पाठवलं आहे.

एबीपी माझाशी बोलताना ते म्हणाले की, “धनगर समाजाची ही जुनी मागणी असून नव्याने मागणी करण्यात आलेली नाही. धनगर समाज गेल्या कित्येक वर्षांपासून आंदोलन करत असून रस्त्यावर उतरतोय, जेलमध्ये जातोय. पण तरीही आमची मागणी काही पूर्ण झालेली नाही. आमच्या मुलांच्या हातात एसटीचा दाखला द्या हीच आमची सरकारकडे मागणी आहे. ते कसं करायचं यासाठी विधी तज्ञांशी चर्चा करा आणि आमचा मार्ग मोकळा करा. पण सरकार यावर कोणतीही चर्चा करताना दिसत नाही हे दुर्दैवी आहे”.

“नोव्हेंबर २०१९ मध्ये हे सरकार आलं आणि आता सप्टेंबर महिना संपत आलाय. पण धनगर आरक्षणावर एकही बैठक आजवर झालेली नाही. कोर्टात केस सुरु आहे तिथे एखादा चांगला वकील देणं वैगेरे असेही काही प्रयत्न झालेले नाहीत. लोकांच्या भावना तीव्र आहेत. करोनामुळे मला अधिवेशनात जाता आलं नाही. दुर्दैवाने तिथे हा प्रश्न मांडू शकलो नाही. तिथंही मी आंदोलनाची तयारी केली होती,” अशी माहिती गोपीचंद पडळकर यांनी दिली. सरकारने चर्चा करुन काही दिवसांत निर्णय घ्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. अन्यथा संघर्ष अटळ असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.