नारायण राणे यांना भाजपाने राज्यसभेची उमेदवारी दिली असतानाच आमदार नितेश राणे यांचे एक ट्विट चर्चेचा विषय ठरला आहे. 'कुछ ही देर की खामोशी है, हमारा दौर आएगा', असे सूचक ट्विट करत त्यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले आहे. महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा जागा रिक्त होत असून त्यासाठी निवडणूक जाहीर झाली आहे. भाजपाकडून नारायण राणे यांना राज्यसभेसाठी संधी देण्यात आली आहे. राज्यसभेवर जाण्यास राणे नाखूश होते. त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना भेटून तशी भावनाही व्यक्त केली होती. राज्य मंत्रिमंडळात येण्यास राणे इच्छुक होते. मात्र राज्यसभा वगळता इतर पर्याय शक्य नसल्याचे राणे यांना कळवण्यात आले. त्यामुळे आता दुसरा मार्ग नसल्याने राणे राज्यसभेसाठी तयार झाल्याचे सांगितले जाते. नारायण राणेंच्या राज्यसभेतील उमेदवारीच्या पार्श्वभूमीवर नितेश राणे यांनी ट्विटरवरुन विरोधकांना प्रत्युत्तर दिले आहे. 'कुछ ही देर की खामोशी है, फिर कानों मे शोर आएगा, तुम्हारा तो सिर्फ वक्त है, हमारा दौर आएगा' असे ट्विट त्यांनी केले आहे. हे सूचक ट्विट करत त्यांनी विरोधकांना सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. चार दिवसांपूर्वी नितेश राणे यांनी संभाजीराजे मालिकेतील एक दृश्य ट्विट करत विरोधकांवर निशाणा साधला होता. दरम्यान, नारायण राणे यांच्या वाटेत काटे पसरवण्यासाठी शिवसेना सज्ज झाली आहे. भाजपाच्या महाराष्ट्र कोट्यातून नारायण राणे यांनी राज्यसभेसाठी अर्ज भरला आहे. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष असलेले नारायण राणे यांनी भाजपाचे सदस्यत्त्व कधी घेतले? असा प्रश्न अनिल परब यांनी विचारला आहे. एका पक्षाचा अध्यक्ष दुसऱ्या पक्षाचा सदस्य होऊ शकत होऊ शकत नाही आणि दुसऱ्या पक्षाच्या अध्यक्षाला एखाद्या पक्षाला उमेदवारी द्यायची असेल तर त्याला आधी पक्षाचा अधिकृत सदस्य करून घ्यावे लागेल तरच त्याला पक्ष बी फॉर्म देऊ शकतो असा नियम असल्याचे त्यांनी नमूद केले. राज्यसभा निवडणूक बिनविरोध भाजपने चार जणांचा अर्ज भरल्याने राज्यसभेची प्रत्यक्ष निवडणूक होण्याची शक्यता निर्माण झाली असली तरी चौथ्या उमेदवाराचा अर्ज गुरुवापर्यंत मागे घेतला जाईल, असे संकेत भाजपच्या वतीने देण्यात आल्याने राज्यातील राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.