महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून मोदी सरकारला पुन्हा एकदा फटकारलं आहे. ‘गेल्या साडे चार वर्षात भारतावर खूपच अत्याचार झाल्याने तो आयसीयूत पोहोचला आहे. लोकसभा निवडणुकीनंतरच आता तो शुद्धीवर येईल’, अशी बोचरी टीका त्यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून केली आहे.

राज ठाकरे यांनी दिवाळीचं औचित्य साधून व्यंगचित्राची मालिका घेऊन येणार असल्याचे रविवारी ट्विटरवरुन जाहीर केले होते. या मालिकेतील पहिलं व्यंगचित्र त्यांनी धनत्रयोदशीनिमित्त रेखाटले आहे. सोमवारी सकाळी त्यांनी हे व्यंगचित्र ट्विटरवर पोस्ट केले. धनत्रयोदिवशी हा दिवस अनेक प्रकारे साजरा केला जातो. वैद्यकीय शास्त्राचा देव धन्वंतरी ह्याचा जन्मदिवस म्हणूनही काही लोक हा दिवस महत्त्वाचा मानतात, असे त्यांनी राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

राज ठाकरेंनी धन्वंतरीचे चित्र रेखाटले आहे. यात भारताला आयसीयूमध्ये दाखवण्यात आले आहे. धन्वंतरी आयसीयूबाहेर जमलेल्या लोकांना उद्देशून सांगतात, ‘काळजीचे कारण नाही. गेल्या साडे चार वर्षात त्याच्यावर (भारतावर) खूप अत्याचार झालेत. लोकसभा निवडणुकीनंतर येईल शुद्धीवर.’ राज ठाकरेंचे हे व्यंगचित्र सोशल मीडियावर व्हायरल होत असून २०० हून अधिक लोकांनी हे व्यंगचित्र रिट्वीट केले आहे.