“मी मराठी देखील आहे आणि हिंदू देखील आहे. मी धर्मांतर केलेलं नाही. माझ्या मराठीला नख लावण्याचा प्रयत्न कुणी केला तर मराठी म्हणून आणि धर्माला हात लावण्याचा प्रयत्न केला तर हिंदू म्हणून अंगावर जाईन असं म्हणत राज ठाकरे यांनी आपल्या आक्रमक भाषणात आपली हिंदुत्वाविषयीची भूमिका विशद केली.  हिंदुत्वाच्या मार्गावर जाणार का? अशी चर्चा सुरु आहे. मी पहिल्याच सभेतच सांगितलंय की, देशाशी प्रामाणिक असलेले मुस्लिम आमचेच आहेत. आम्ही अब्दुल कलाम, झहीर खान, जावेद अख्तर यांना नाकारु शकत नाही असे राज म्हणाले.

जावेद अख्तरांबरोबर ऊर्दू भाषेवरुन झालेल्या चर्चेचा किस्सा त्यांनी यावेळी सांगितला. “ऊर्दू मुस्लिमांची भाषा आहे हे तुम्हाला कोणी सांगितलं? ऊर्दू मुस्लिमांची भाषा नाही. बांगलादेश बंगाली भाषेसाठी स्वतंत्र झाला. ऊर्दूसाठी नाही. भाषा कुठल्याही एका धर्माची नसते तर ती त्या भागाची असते” असे राज म्हणाले.

“जे इथे येऊन धिंगाणा घालणार तर मी आडवाच जाणार. रझा अकादमीच्या मोर्चाच्यावेळी आमच्या पोलिसांवर हात टाकला होता त्यावेळी मोर्चा काढणार पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना होता. हिंदी सिनेसृष्टीत पाकिस्तानी कलाकार धिंगाणा घालत होते. त्यावेळी त्यांना हाकलण्याचं काम मनसेनं केलं. त्यावेळी कोणी मला हिंदुत्वाच्या मार्गाने चाललोय हे विचारलं नाही” असा सवाल राज यांनी केला.

आपण ज्वालामुखीवर बसलेलो आहोत

आपण ज्वालामुखीवर बसलेलो आहोत. त्यामुळे भारतात बेकायदेशीररित्या वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी, पाकिस्तानी नागरिकांना इथून हाकलून दिलचं पाहिजे. त्यासाठी मी केंद्र सरकारला पाठिंबा द्यायला तयार आहे असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्रात काही भाग असे आहेत. त्या भागांमध्ये अनेक बाहेरच्या देशांमधले मौलवी जात आहेत. काय करत आहेत माहित नाही. पोलीसही आत जाऊ शकत नाहीत. तिथे काय शिजतंय हे कळत नाही. पण पोलिसांच्या माहितीनुसार प्रचंड काहीतरी मोठं घडवण्याचं कारस्थान रचलं जातयं. ही माहिती असेल तर पोलिसांना मोकळे हात देण्याची गरजेचं आहे असे राज ठाकरे म्हणाले.