“महाविकास आघाडीचं सरकार फार काळ टिकेल असं वाटत नाही. ज्या सरकारमध्ये एकोपा नसतो एकमेकांना विचारलं जात नाही ते जास्त काळ टिकणार नाही,” असं मत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी व्यक्त केलं. ‘माझा महाराष्ट्र माझं व्हिजन’या एबीपी माझाच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी सरकारच्या कामकाजावर टीका केली. “लॉकडाउन हटवून सर्व सुरळीत केलं जावं. राज्य केंद्राकडे बोट दाखवतंय, केंद्र राज्यांकडे बोट दाखवतंय, पण लोकांना याविषयी घेणं देणं नाही. लोकांची एकच अपेक्षा आहे की आम्हाला यातून सोडवा,” असंही ते म्हणाले.

“महाविकास आघाडीच्या सरकारच्या तीन पक्षांमध्ये एकोपा नाही. त्या सरकारमध्ये एकमेकांना विचारलं जात नाही. त्यामुळे ते सरकार फार काळ टिकणार नाही,” असं राज ठाकरे म्हणाले. “मुख्यमंत्री हे शासकीय पदावर आहेत. त्यांनी बाहेर पडून काम केलंच पाहिजे. मला गेले काही महिने मुख्यमंत्री केवळ टिव्हीवरच दिसले. त्यांचा कारभार दिसलाच नाही. आता कुठे ते कामकाजाला सुरूवात करत आहेत. त्याबद्दल काही अधिक बोलावंस वाटत नाही,” असं ते यावेळी म्हणाले.

आणखी वाचा- … म्हणून मी बाहेर पडलो नाही; राज ठाकरेंनी सांगितलं कारण

लॉकडाउन अनलॉकचा ताळमेळ नाही

“काही दिवसांपूर्वी मंत्रालयात एक बैठक पार पडली होती. त्या बैठकीत मी अनलॉक कधी करणार हे विचारलं होतं. त्याचं उत्तर आतापर्यंत मिळालं नाही. सरकारनं नियमांप्रमाणे दुकानं सहा वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास सांगितली आहेत. काही कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम दिलं आहे. ते सहा वाजेपर्यंत कामावर आहेत. तर त्यांनी मग सामान घ्यायला कधी जावं. एक दिवस एका फुटपाथवरची दुकानं सुरू ठेवायची तर दुसऱ्या दिवशी दुसऱ्या ठिकाणची उघडी ठेवायची. लॉकडाउन आणि अनलॉकचा ताळमेळच नाही,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.

आणखी वाचा- उद्धव ठाकरे मला फक्त टीव्हीवरच दिसले – राज ठाकरे

जनतेनं आशीर्वाद द्यावा

“माझ्या मनातील महाराष्ट्र कसा असावा याचं चित्र माझ्या महाराष्ट्राच्या विकास आराखड्यात मांडलं आहे. जेव्हा माझ्या हातात सत्ता येईल तेंव्हा मी तो घडवेन. जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवणं माझा स्वप्न आहे, त्यासाठी जनतेनी आशीर्वाद द्यावा,” असंही राज ठाकरे यावेळी म्हणाले.

आणखी वाचा- “डब्ल्यूएचओ काही माझ्याकडून सल्ले घेत नाही”; राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला

मनोरंजन क्षेत्राला मोकळीक हवी

“मनोरंजन क्षेत्राला आता मोकळीक द्यायला हवी. मात्र तिथे उगाच काही वाकडेतिकडे नियम लावता कामा नये, आज जगातील अनेक देशांत सगळं सुरळीत झालं आहे. आपण पुरेशी काळजी घ्यायला पाहिजे. पण आता बंद ठेवणं हा मार्ग नाही,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.