Raj Thackeray Slams Shivsena : शिवसेना सातत्याने भाजपाला विरोध करत आहे. यापुढे आम्ही भाजपासोबत निवडणूक लढवणार नाही, नाणार प्रकल्प कुठल्याही परिस्थितीत होऊ देणार नाही अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे. उद्या लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर चर्चा आणि मतदान होणार आहे. त्यावेळी शिवसेना काय भूमिका घेते, ते मला बघायचेय असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. ते औरंगाबादमध्ये एका सभेमध्ये बोलत होते. शिवसेनेचा भाजपाला एवढा विरोध असेल तर त्याची सुरुवात उद्यापासून अविश्वास प्रस्तावापासूनच होऊं दे असे राज म्हणाले. शिवसेनेने कितीही भाजपाला विरोध दाखलवा तरी ते घरंगळत जाणार हे मला ठाऊक आहे. कितीही विरोध केला तरी ते सत्तेतून बाहेर पडणार नाही. स्वत:च्या तुंबडया भरत रहाणार असा आरोप राज ठाकरे यांनी केला आहे. ज्यांच्या हातात महाराष्ट्राच्या जनतेने सत्ता दिली त्यांनी राज्याची वाट लावली आहे. सत्ताधाऱ्यांनी राज्याचा सत्यानाश केला आहे. बाकीचे नालायक ठरल्याशिवाय तुम्हाला मनसेची आठवण येत नाही, असे वक्तव्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी केले. भाजपा इव्हीएमचा गैरवापर करत असल्याचा गंभीर आरोप राज यांनी केला. इव्हीएमबद्दल मी नेहमी बोलतो. अनेक ठिकाणी इव्हीएममध्ये घोळ असल्याचे निवडणुकांमध्ये दिसून येत आहे. महापालिका निवडणुकींच्यावेळी आमच्या अनेक उमेदवारांना शून्य मते मिळाली. शून्य मते कशी पडू शकतात ? त्या उमेदवाराला स्वत:चे तर मत पडू शकते की नाही, असा उलट सवाल त्यांनी केला. अशाच प्रकारचे घोळ संपूर्ण देशभरात सुरू आहेत, नाशिकमध्येही असेच झाल्याचे त्यांनी म्हटले..