महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे येत्या २३ जानेवारीला मुंबईमध्ये महाअधिवेशन होणार आहे. या अधिवेशनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी कृष्णकुंजवर मनसे नेत्यांची बैठक बोलवली होती. पहिल्यांदाच होत असलेल्या पक्षाच्या या महाअधिवेशनाला राज्यभरातून नेते, कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. येणाऱ्या कार्यकर्त्यांची व्यवस्था कशी करणार? कार्यक्रम कसा असेल? याबद्दल चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलवण्यात आली आहे. पक्षाच्या झेंडयाचा रंग बदलणार का? कृष्णकुंजवर उपस्थित असलेल्या प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधीने मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर यांना पक्षाच्या झेंडयाबद्दल प्रश्न विचारला. पक्षाचा झेंडयाचा रंग बदलणा का? असा प्रश्न विचारला. त्यावर अभ्यंकर यांनी लवकरच काय निर्णय होतात, ते तुम्हाला दिसेलच. 'सब्र का फल मीठा होता हैं' असे सूचक विधान त्यांनी केले. २३ तारीखच्या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर काल मनसेचे दोन पोस्टर समोर आले. या दोन्ही पोस्टर्सचा रंग पूर्णपणे भगवा आहे. त्यामुळे भविष्यात मनसे हिंदुत्वाच्या मार्गाने वाटचाल करेल अशी चर्चा सुरु आहे. शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत मिळून सरकार स्थापन केले आहे. शिवसेनेने नेहमीच हिंदुत्वाचा पुरस्कार केला आहे. पण आता ते काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत असल्याने मनसेकडून प्रखर हिंदुत्वाचा पुरस्कार करण्याची भूमिका घेतली जाऊ शकते. भविष्यात मनसे आणि भाजपा युती होईल अशी देखील चर्चा आहे. मनसेने अमराठींना विरोध करण्याची भूमिका सोडली तर, युती बाबत विचार होऊ शकतो असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले होते. त्यामुळे येत्या २३ तारखेला राज ठाकरे काय भूमिका घेणार याकडे सगळयांचे लक्ष लागले आहे. मनसेचा माजी आमदार राज ठाकरेंच्या भेटीला कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी शनिवारी सकाळी कृष्णकुंजवर जाऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. हर्षवर्धन जाधव अचानक राज ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.