महाराष्ट्रात परिस्थिती बिकट असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात १५ दिवसांच्या संचारबंदीची घोषणा केली आहे. यादरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं असून राज्यातील परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली आहे. यावेळी त्यांनी मोदींसमोर राज्यासाठी पाच प्रमुख मागण्या मांडल्या आहेत. यावेळी त्यांनी मोदींना सवालही विचारला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय लिहिलं आहे पत्रात –
“कोविडची साथ सुरू झाल्यापासून महाराष्ट्राला सर्वाधिक फटका बसला आहे. देशातल्या पहिल्या काही रुग्णांपैकी काही महाराष्ट्रात आढळले. तेव्हापासून निव्वळ आकड्यांमध्ये मोजल्यास, सर्वाधिक रुग्ण आणि दुर्देवाने सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात देखील झाले आहेत. आज संपूर्ण देश कोविडच्या साथीला तोंड देत असातना महाराष्ट्रातली स्थिती सर्वात बिकट झाली आहे,” असं राज ठाकरे यांनी पत्रात म्हटलं आहे.

उद्धव ठाकरेंच्या मदतीला राज ठाकरे; मोदींना पत्र लिहून केल्या पाच प्रमुख मागण्या

“करोनाच्या पहिल्या लाटेनंतर त्यानंतरची राष्ट्रीय लॉकडाउन यामुळे महाराष्ट्राचे नागरिकांचे अतोनात नुकसान झाले. याचे आर्थिक, सामाजिक पडसाद अर्थातच देशभरही पडलेले आपण आजही अनुभवत आहोत. ही नवी लाट रोखण्यासाठी वारंवार निर्बंध लावणे, लॉकडाउन जाहीर करणं महाराष्ट्राला परवडणारं नाही. ते कायमचे उपायही नव्हेत. पण जर राज्याला पुरेश्या लसी मिळतच नसतील तर पर्याय तरी काय उरतो?,” असा सवाल राज ठाकरेंनी मोदींना विचारला आहे.

पुढे ते म्हणाले आहेत की, “कोरोनाच्या संसर्गाला तोंड द्यायचे असेल तर १०० टक्के लसीकरण करण्याची रणनीती महाराष्ट्रासाठी महत्त्वाची आहे व कळीची आहे. म्हणूनच महाराष्ट्रात १०० टक्के लसीकरणाचे उद्दिष्टं ठेवून, राज्यातील सर्व वयोगटातील १०० टक्के लोकांचे लसीकरण लवकरात लवकर करायला हवं. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विशेषत: कमी कालमर्यादेत आवश्यक तेवढ्या लसी पुरवण्यासाठी, महाराष्ट्राला केंद्राची साथ हवीच”.

“करोनामुळे विविध राज्यांमध्ये वेगवेगळे परिणाम झाले आहेत. साथीला नियंत्रित करण्यासाठी प्रत्येक राज्याला स्थानिक परिस्थितीनुसार धोरण आखण्याची गरज आहे. आरोग्य हा विषय राज्यांचा आहे. म्हणून केंद्राने राज्यांना केवळ परवानगीच नाही, तर स्थानिक परिस्थितीला अनुसरून योग्य ती उपाययोजना आखण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी भिन्न उपाय केले जातील, त्यातून एकमेकांना शिकण्याची संधीही मिळेल,” असं राज यांनी म्हटलं आहे.

राज ठाकरेंच्या पाच प्रमुख मागण्या –
१) महाराष्ट्राला स्वतंत्रपणे लसी खरेदी करू द्या.
२) राज्यातील खासगी संस्थांनाही लसी खरेदी करता याव्यात.
३) सिरमला महाराष्ट्रात मुक्तपणे, पण योग्य नियमन करून लस विक्रीची परवानगी द्यावी.
४) लसीचा पुरवठा वेळेत व्हावा म्हणून महाराष्ट्रातल्या इतर संस्थांना (उदा. हाफकिन व हिंदुस्थान अँटिबायोटिक) लस उत्पादन करण्यासाठी मुभा द्यावी.
५) करोनावरील उपचार करण्यासाठी लागणारी आवश्यक औषधं उदा. रेमडेसिवीर, ऑक्सिजन याचा पुरेसा पुरवठा राज्यात असावा म्हणून राज्याला आवश्यक पावलं उचलण्यासाठी मोकळीक द्यावी.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns president raj thackeray letter to pm narendra modi vaccination lockdown sgy
First published on: 14-04-2021 at 12:37 IST