उत्तर प्रदेशातील हाथरस येथे १९ वर्षीय दलित तरुणीवर सामूहिक बलात्काराची घडना घडल्यानंतर सध्या देशभरात सर्वत्र संतापाचं वातावरण आहे. प्रमुख विरोधीपक्ष असलेला काँग्रेससह सर्व राजकीय पक्ष योगी आदित्यनाथ यांच्या सरकारला धारेवर धरत आहेत. पीडित मुलीवर बलात्कार केल्यानंतर तिचा दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हाथरस प्रकरणावर आपला संताप व्यक्त केला असून, ही घटना पाशवी असल्याचं म्हटलं आहे. याचसोबत महाराष्ट्रात काही झालं की स्वतःला देशाचा आवाज घोषित करुन अर्वाच्च पद्धतीने ओरडणारे आज गप्प का आहेत?? असा प्रश्न विचारत राज ठाकरेंनी प्रसारमाध्यमांनाही जाब विचारला आहे.

राज ठाकरेंनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर आपली प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केला आहे. यावेळी राज ठाकरेंनी पीडितेच्या कुटुंबियांना भेटण्यापासून का अडवलं जात आहे, नक्की कशाची भीती सरकारला वाटत आहे असा प्रश्न विचारला आहे.

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हाथरसला पीडित कुटुंबाची भेट घेण्यासाठी जात होते. यावेळी पोलिसांनी राहुल गांधींना अडवून त्यांना ताब्यात घेतलं आहे. दरम्यान, पीडित तरुणीचा शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे. यामधून काही महत्त्वाच्या गोष्टींचा उलगडा झाला आहे. एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, पीडितेच्या मणक्याला फ्रॅक्चर झाला होता. तसंच तिचा गळा दाबण्यात आला होता. महत्त्वाचं म्हणजे ‘अंतिम निदान’मध्ये बलात्कार झाला आहे याला दुजोरा देण्यात आलेला नाही. दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयानेच शविवच्छेदन अहवाल तयार केला आहे. उपचारासाठी पीडितेला अलिगड रुग्णालयातून सफदरजंग रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. शवविच्छेदन अहवालानुसार, मणक्याला फ्रॅक्चर झाला असताना रक्तस्त्रावदेखील झाला होता.

यासोबत पीडितेच्या गळ्यावर आढलेल्या खुणा तिचा गळा दाबल्याचं स्पष्ट करत असल्याचंही अहवालात नमूद आहे. पीडितेचा गळा दाबवण्यात आला असला तरी त्यामुळे मृत्यू झाला नसल्याचाही अहवालात उल्लेख आहे. व्हिसेराच्या आधारे मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होईल असं अहवालात सांगण्यात आलं आहे. व्हिसेरा जपून ठेवण्यात आलं असून इतर महत्त्वाचे नमुने तपास अधिकाऱ्याकडे सोपवण्यात आल्याचं रुग्णालयाने सांगितलं आहे.